जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे होणाऱ्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला काही केल्या मुहूर्त लागत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता हा कार्यक्रम चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आला आहे. राज्यातील वेगवान राजकीय घडामोडींमुळे हा कार्यक्रम तीनवेळा पुढे ढकलण्यात आला होता, तर आता हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला मुसळधार पावसाचा लाल इशारा दिल्याने कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे.

हेही वाचा >>> ‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने फसवणुकीच्या प्रकारांमध्ये वाढ; सायबर चोरट्यांकडून ३१ लाखांची फसवणूक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळण्यासाठी विद्यमान राज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम आणला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्याप्रमाणे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे हा कार्यक्रम ३ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र, राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवार यांनी पदाचा राजीनामा देत राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परिणामी ३ जुलैऐवजी ८ जुलै ही तारीख मंत्रालयातून जिल्हा प्रशासनाला देण्यात आली होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारामुळे ऐनवेळी ही तारीखही रद्द करत १३ जुलै ही नवी तारीख कार्यक्रमासाठी देण्यात आली होती. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे हा कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आला होता. दरम्यान, हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने शनिवारी लाल इशारा आणि पुढील तीन दिवस नारंगी इशारा दिला आहे. त्यामुळे जेजुरी येथे २३ जुलै रोजी होणारा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. जिल्ह्याच्या घाट क्षेत्रातील पावसाची स्थिती आणि पुढील काही दिवसाचा हवामान अंदाज लक्षात घेता लाभार्थ्यांना कार्यक्रम स्थळापर्यंत येण्यास कोणताही त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षातर्फे कळविण्यात आले आहे.