आजीपासून नातीपर्यंत.. चॉकलेटपासून वातीपर्यंत..

दिवाळी आली की आठवण यायला लागते ती चटकदार आणि चमचमीत फराळाची. या फराळाचे साहित्य एकाच पिशवीत, एकाच छपराखाली आणि तेही स्वस्त दरात मिळाले तर.. ही नुसतीच कल्पना नाही. ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे ती पुण्यातील ‘ग्राहक पेठ’ने. दिवाळी सरंजाम योजनेपासून तांदूळ महोत्सवापर्यंत आणि धान्य महोत्सवापासून फलोत्सवापर्यंत अनेकविध योजनांची मुहूर्तमेढ रोवणारी सगळ्यांच्या परिचयाची पुण्यातील ‘ग्राहक पेठ’ हा व्यापार क्षेत्रातील एक यशस्वी ब्रँड म्हणून पुण्याला परिचित आहे. आजीपासून नातीपर्यंत आणि चॉकलेटपासून वातीपर्यंत असे नाते ‘ग्राहक पेठ’ने पुणेकरांशी निर्माण केले आहे.

‘अखिल भारतीय ग्राहक पंचायत’ या ग्राहकांनी सुरू केलेल्या ग्राहकांच्या संघटनेचा जन्म पुण्यातला. त्यातून डॉ. भा. र. साबडे यांनी सूर्यकांत पाठकांसारख्या धडाडीच्या सहकाऱ्याच्या बरोबरीने या ‘ग्राहक पेठे’ची मुहूर्तमेढ रोवली. व्यवहारात नफा मिळविण्याचे प्रमाण उचित असावे आणि कोणाचे शोषण होऊ नये, यासारख्या अनेक विचारधारांना बरोबर घेऊन ‘ग्राहक पेठ’ पुढे जात राहिली. ग्राहक, उत्पादक, वितरक, शेतकरी, कर्मचारी यांच्या समन्वयातून सुरू झालेली ही ग्राहक चळवळ पाहता पाहता देशव्यापी झाली. ग्राहक पंचायतीच्या चळवळीने खरेदी-विक्री, ग्राहक-दुकानदार, देवाण-घेवाणीचे व्यवहार बाजार, मार्केटिंग या सर्वानाच वेगळे आयाम मिळाले. ग्राहक पेठ ही केवळ खरेदी-विक्रीची जागा न राहता त्यांनी नव्या सिद्धांतांना रुजवित ग्राहकांना केंद्रबिंदू मानत अनेक विकसनशील गोष्टी करण्याबरोबरच सामाजिक कार्यातही आपला मोठा वाटा उचलला.

टिळक रस्त्यावर असलेल्या ग्राहक पेठ येथे सणवार, ऋतुमानाप्रमाणे आणि आजीपासून नातीपर्यंत सर्वाच्या गरजेचे भान ठेवले गेले. त्यामुळे शाळा सुरू होताना संस्कारक्षम वह्य़ा येथे मिळतात. गणेशोत्सवात पेणच्या गणेशमूर्ती मिळतात. छोटे उद्योजक, महिला उद्योजक, शेतकरी, उत्पादक या सगळ्यांच्या बरोबरीनेच ग्राहक पेठेने ग्राहकांबरोबर एक स्नेहाचे आणि आपुलकीचे नाते जपले आहे. ग्राहकांच्या तीन पिढय़ांचा वारसा येथे सहजतेने जपला जात आहे. विविध वस्तूंच्या विक्री-खरेदीबरोबरच वीज, टेलिफोन, गॅसच्या तक्रारी, फसव्या योजना, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती अशा ग्राहकांच्या विविध अडचणींच्या निराकारणाचे कामही येथून केले जाते. ग्राहक चळवळ, शोषणमुक्तीचा लढा, आर्थिक परिवर्तनाचा प्रकल्प या तत्त्वांची प्रचिती ग्राहक पेठेच्या माध्यमातून अनेकांना आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय सहकारी फेडरेशनने केलेल्या देशपातळीवरील सर्वेक्षणानंतर ग्राहक पेठेला ‘सवरेत्कृष्ट सहकारी भांडार’ असे गौरविण्यात आले होते. त्याबरोबरच ‘राजमान्य आणि लोकमान्य’ पुरस्काराने देखील ग्राहक पेठेला गौरविण्यात आले आहे. आंबा, चिकू, डाळिंब, द्राक्ष अशी फळे थेट उत्पादकांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रकल्प जसा येथे राबवला जातो, तसेच समृद्धी बिनव्याजी ठेव योजनेसारख्या चार योजनांद्वारे ग्राहकांसाठी फायदेशीर खरेदीचा उपक्रमही येथे आहे. याशिवाय आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या विद्यार्थ्यांना जूनमध्ये गणवेश, वह्य़ा-पुस्तके विनामूल्य देण्याचा उपक्रम कोणताही गाजावाजा न करता ग्राहक पेठ करते. त्याबरोबरच सामाजिक बांधिलकीतून अंध-अपंग-मूकबधिरांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्रीही केली जाते. ‘ग्राहकहित’ मासिकाच्या माध्यमातून ग्राहकांचे प्रबोधन करण्याबरोबरच दिवाळीसाठी ना नफा ना तोटा योजनेतून राबवला जाणारा दिवाळी फराळाचा उपक्रम या आणि अशा सगळ्याच गोष्टी सहकारी भावना आणि चळवळ या रूपातून येथे समृद्ध होत आहेत.