इंदापूर : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्याने धरणाच्या पाण्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. धरणात ६६ टक्के म्हणजे ३५.४४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. मात्र, पाणलोट क्षेत्रात गाळपेरीची पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. दरम्यान, पाणीसाठा वाढत असल्याने धरणातून दहा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
मागील पावसाळ्यामध्ये हे धरण शंभर टक्के भरूनही पाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर झाल्याने चलसाठा संपुष्टात आला. त्यानंतर मृत साठ्यातीलही २६ टक्के पाणी वापरण्यात आले होते. मात्र, या वर्षी अवकाळी पाऊस पथ्यावर पडला असून, धरण ६६ टक्के भरले असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.धरणात दौंड येथून विसर्गात वाढ झाल्याने पाणीपातळी वाढत आहे. त्यामुळे दहा हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
शेतकरी हवालदिल
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गाळपेरीची पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. उन्हाळ्यामध्ये धरणाची पाणीपातळी कमी झाल्यावर पाणलोट क्षेत्रात शेतकरी आपापल्या जमिनींमध्ये चारा पिके घेतात. त्यांमध्ये प्रामुख्याने मका, कडवळ, बाजरी आदींचा समावेश असतो. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडवण्यात या गाळपेरीतून मदत होत असते. मात्र, यंदा पाऊस लवकर सुरू झाल्याने या पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहे.