राज्यातील काही भागांत ‘गुलाब’ चक्रीवादळाचा परिणाम

पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘गुलाब’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम होणार असून, काही भागांना अतिवृष्टीचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. २७ आणि २८ सप्टेंबरला राज्यात पावसाचे प्रमाण अधिक राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, औरंगाबाद, परभणी, लातूर, नांदेड, िहगोली, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्य़ांमध्ये मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

बंगालच्या उपसागरात वायव्य भागामध्ये ‘गुलाब’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे चक्रीवादळ तीव्र होऊन ओडिशाच्या गोपाळपूर, आंध्र प्रदेशच्या किलगामपट्टनम दरम्यान रविवारी धडकले. चक्रीवादळामुळे पूर्व किनारपट्टीच्या भागात मोठा तडाखा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. चक्रीवादळाचा फटका थेट विदर्भापर्यंत बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भापासून कोकणपर्यंत सर्वच भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाचा इशारा कुठे?

*कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्य़ात २७, २८ सप्टेंबरला काही ठिकाणी अतिवृष्टी, तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

*उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबारमध्येही या कालावधीत अतिवृष्टीचा इशारा आहे. नाशिक, पुणे, नगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर आदी जिल्ह्य़ांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.

*मराठवाडय़ातील औरंगाबाद, जालना, परभणी, िहगोली, नांदेड आदी जिल्ह्य़ांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

* विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्य़ात काही ठिकाणी अतिवृष्टी, तर यवतमाळ, गडचिरोलीसह इतर भागांतही पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.