पुणे : ‘लोकसभा, विधानसभा निवडणुकीपूर्वी महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ३२ गावातील नागरिकांच्या मिळकत करवसुली करण्यास स्थगिती देण्यात आली आहे. आता निवडणुकीच्या निकालानंतर या गावांना वेगळा न्याय लावला जात असून, गावांकडून करवसुली करण्याची चर्चा सुरू आहे, हे योग्य नाही. या गावांमध्ये कोणत्याही सुविधा दिल्या जात नसताना कर कसला गोळा करता,’ असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी महापालिकेत आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘आमदार बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमधील मिळकतकराचा विषय महत्त्वाचा आहे. निवडणुकीपूर्वी वेगळा न्याय आणि निकाल लागल्यानंतर दुसरा न्याय लावणे योग्य नाही,’ असे सुळे यांनी सांगितले. यावर राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन या गावांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
‘शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडीची प्रश्न बिकट होत चालला आहे. गुरुवारी गंगाधाम चौकात अपघातात एका महिलेला जीव गमवावा लागला. महापालिकेने आवश्यक त्या सुधारणा केल्या पाहिजेत. पाणी, रस्ते, तसेच महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या पावसाळापूर्वीच्या कामांचा आढावा आयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेत घेण्यात आला,’ असे खासदार सुळे यांनी सांगितले.
‘आसावरी जगदाळे हिला महापालिकेत नोकरी द्या’
‘पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्या नागरिकांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी अशी मागणी होती. पुण्यातील संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिला महापालिकेत नोकरी मिळावी, अशी मागणी केली होती. ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे. पण, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ती करावी,’ अशी मागणीही खासदार सुळे यांनी केली.
‘प्रभाग रचना पारदर्शकपणे करावी’
‘महापालिकेच्या निवडणुकीत प्रभागरचना करताना ती पारदर्शकपणे आणि सूत्राला धरून केली पाहिजे. कोण काय सांगत आहे यावरून प्रभाग रचना केली जाऊ नये,’ अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली. तसेच, ‘संपूर्ण राज्यातील प्रभाग रचना पारदर्शक झाली पाहिजे,’ असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.