लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : ‘आयएएस होणे ही मोठी गोष्ट आहे. मात्र यूपीएससीचे अवाजवी महत्त्व निर्माण करून ठेवले आहे. अनेकांनी ही परीक्षा म्हणजे आयुष्य करून ठेवले आहे. वास्तविक, ही परीक्षा आयुष्याचा एक छोटा भाग आहे. या परीक्षेतील यशापयश तुमची किंमत ठरवत नाही,’ अशी भूमिका राज्यातील पहिली मुस्लिम महिला आयएएस अधिकारी आदिबा अनाम यांनी मांडली. ‘आयएएस नाही झाले, तरी समाजासाठी काम करता येऊच शकते. अपयश आले म्हणजे काहीच करता येणार नाही, असा विचार का केला जातो,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
युनिक ॲकॅडमीतर्फे ‘युनिक टॉपर्स टॉक’ या कार्यक्रमात यूपीएससी २०२४ मध्ये देशात १४२ वा क्रमांक पटकावलेल्या आदिबा अनाम यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. सेनापती बापट रस्ता येथील विश्वभवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी युनिक ॲकॅडमीचे तुकाराम जाधव, मल्हार पाटील, जव्वाद काझी, निजामुद्दीन शेख, प्रवीण चव्हाण या वेळी उपस्थित होते.
अनाम यांनी त्यांच्या भाषणातून त्यांच्या आयएएस होण्यापर्यंतचा प्रवास उलगडला. त्या म्हणाल्या, ‘या परीक्षेचा अभ्यास खूप थकवतो. मात्र, यश मिळण्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवावेच लागते. आपण १०० टक्के प्रयत्न केल्याचे समाधान मिळाले पाहिजे, इतके प्रयत्न केले पाहिजेत. चांगले प्रयत्न करूनही यश न मिळाल्यास तो नशिबाचा भाग असतो. प्रत्येक यशवंताची पद्धत वेगळी असते. त्यामुळे कोणी काय केले याचा विचार न करता स्वतःचा विचार केला पाहिजे, स्वतःचे नियोजन केले पाहिजे.
माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी खूप त्याग केला. आर्थिक परिस्थिती नसताना वडील काहीतरी करून पैसे द्यायचे. पैसे मागण्यासाठी लाज वाटायची. दोन-तीन हजारांत महिना काढायचे. माझ्या कुटुंबात फार कोणी शिकलेले नाही. मात्र, माझ्यातील गुण मामाने ओळखले. मामाने अपयशातही साथ दिली, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
मूल्यांची साथ सोडणार नाही
‘आपण मागे वळून पाहणे आवश्यक आहे. आपण माणूस म्हणून घडलो का, हे पाहणे गरजेचे आहे. आपल्यापेक्षाही जास्त अडचणी असलेले लोक असतात. आता निवड झाल्यानंतर आयएएस म्हणून काम करणार आहे. मात्र, मी मूल्यांची साथ सोडणार नाही, प्रामाणिकपणे काम करणार आहे. समाजासाठी कार्यरत राहणार आहे,’ असेही अनाम यांनी सांगितले.