पिंपरी- चिंचवड : शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चा आकुर्डी चौक ते तहसीलदार कार्यालय निगडी या मार्गावर काढण्यात आला. जातीनिहाय जनगणना करून सर्व मागासवर्गीयांना आरक्षण देण्यात यावे, शेतकरी पिक विम्याचे पैसे तत्काळ देण्यात यावे, बेरोजगार युवकांसाठी त्वरित नोकर भरती करण्यात यावी, पेट्रोल डिझेल व घरगुती वापराच्या गॅसचे दर त्वरित कमी करण्यात यावे, राज्यात सध्या गाजत असलेल्या अमली पदार्थांच्या घटनांवर नियंत्रण करून संबंधितांना कठोर शासन करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी आज हवालदिल झालेल्या जनतेच्या भावनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि त्यांचा आक्रोश व्यक्त करणाऱ्या जन आक्रोश मोर्चाचे आयोजन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. या मोर्चा दरम्यान तहसीलदार कार्यालयासमोर निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे प्रवक्ते गौरव चौधरी, ज्येष्ठ महिला नेत्या शामलाताई सोनवणे, कैलास कदम यांनी मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीची मोफत वायफायची घोषणा हवेतच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले, “केंद्र सरकारच्या धोरणांमुळे एकंदरीतच कामगार, कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्य, नोकरदार, शिक्षक, विद्यार्थी, नागरिक, गृहिणी सर्व हवालदिल झाले आहेत. प्रचंड महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढवून सोबत ईडी, आयटी, सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर करत सुडाचे राजकारण या भाजपने देशभरामध्ये सुरू केले आहे. राज्यातली परिस्थिती पाहता देखील या तिघाडी सरकारच्या माध्यमातून केवळ आश्वासनांचा पाऊस आणि ठोस कृती कार्यक्रम काही नसल्याचे चित्र दिसून येत आहे, एकंदरीतच हवालदिल झालेली जनता आक्रोश करत आहे आणि या आक्रोशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही हा मोर्चा आयोजित केला आहे. त्रस्त झालेली जनता हे सरकार उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही.”