पुणे : आळंदीमध्ये पुन्हा एकदा इंद्रायणी नदी फेसाळली आहे. कालपासून नदीची अवस्था बिकट झाल्याचे निदर्शनात आले. काल (बुधवारी) देखील इंद्रायणी नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडल्याने नदी फेसाळली होती. यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सध्या अवघ्या देशभरात कडाक्याची थंडी आहे. अशातच पुण्यातील आळंदीत इंद्रायणी नदी फेसाळली आहे. नदीवर पांढरा फेस आला असून यामुळे नदी नव्हे तर पांढरा बर्फ आहे, असाच भास काही वेळ नदी पाहिल्यानंतर होतो. गेल्या वर्षभरात इंद्रायणी नदी फेसाळल्याच्या घटना अनेकदा समोर आलेल्या आहेत. स्थानिक नागरिक आणि वारकऱ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत राज्य शासनाकडे नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी साकडे घातले होते. हेही वाचा : पुणेकरांच्या खिशाला झळ! नवीन वर्षात ओला, उबरचा प्रवास महागला इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत हिवाळी अधिवेशनात देखील सत्ताधारी आमदारांनी राज्य सरकारला याबाबत धारेवर धरलं होतं. असं असलं तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग येत नसल्याचं या घटनेवरून अधोरेखित होत आहे. इंद्रायणी नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडलं जात असल्यानेच इंद्रायणी नदीची अशी दुरवस्था झाली असून नेमकं प्रशासन कोणाला पाठिशी घालत आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिक आणि वारकऱ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे.