भारतातील सेवा क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या बीव्हीजी इंडिया लिमिटेड या कंपनीच्या मुख्य कार्यालयावर आज (बुधवार) सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकल्याचे वृत्त आहे. मात्र, कुठल्या कारणासाठी ही कारवाई करण्यात आली हे अद्याप समजू शकलेले नाही.

सुत्रांच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील बीव्हीजीच्या मुख्य कार्यालयावर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकाळी अचानक छापेमारी केली. त्याचबरोबर कंपनीच्या दिल्ली, मुंबई, पुणे येथील कार्यालयावरही छापे टाकण्यात आले. दरम्यान, कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत विविध प्रकारच्या सेवा पुरवण्याचे काम बीव्हीजी कंपनी करते. राष्ट्रपती भवन, संसद भवन या ठिकाणच्या अनेक कामांची कंत्राटे या कंपनीकडे आहेत. त्याचबरोबर आशियातील सर्वांत श्रीमंत महानगर पालिका म्हणून उल्लेखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कंत्राटही याच कंपनीकडे आहे. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि राष्ट्रपती भवन अशा विविध ठिकाणी अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने स्वच्छतेचे काम या कंपनीद्वारे केले जाते. त्याचबरोबर, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा आणि कृषी क्षेत्रात बियाणं, खतं आणि किटकनाशके निर्मितीतही बीव्हीजी काम करते.

चौकशीला पूर्ण सहकार्य – हणमंत गायकवाड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राप्तिकर विभाग चौकशी करीत आहे ही धाड नाही. आम्हाला एकही रुपयांची रोख मिळकत नाही, आमचा सर्व व्यवसाय स्वच्छ आहे. कुठेही रोख व्यवहार नाही त्यामुळे आम्हाला घाबरण्याचे काहीही कारण नाही. रात्र-दिवस काम करून ८ लोकांची कंपनी ८० हजार लोकांची झाली आहे. शेतीमध्ये काम करत आहे, काही लोकांना पटत नसेल खुपत असेल तुम्ही मोठं होत असताना हितशत्रू वाढतात. शेती, हेल्थ केअरमध्ये कंपनीचे मोठे काम असून समाजाच्या हिताचे काम करीत आहे. आम्ही या चौकशीला सहकार्य करीत आहोत. चौकशीसाठी त्यांना आम्ही सर्व चाव्या दिल्या आहेत, सर्व कॉम्प्युटर्सचे पासवर्ड दिले आहेत, असे स्पष्टीकरण बीव्हीजीचे अध्यक्ष हणमंत गायकवाड यांनी लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना दिले.