पिंपरी-चिंचवड: इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली आहे. इंद्रायणी नदीवरील हे संकट कधी दूर होईल अशी विचारणा आता वारकरी देखील करू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील इंद्रायणी नदी प्रदूषणाबाबत आश्वासन दिले होते. हे आश्वासन हवेत विरले का? असा प्रश्न आळंदीकर विचारत आहेत. हेच आश्वासन पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी आळंदीत दिल होत. नदी प्रदूषणाचा मुद्दा मोठा असून नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी वेळ लागेल असे फडणवीस यांनी आश्वस्त केलं होतं. महिन्यातून एक वेळ इंद्रायणी नदी फेसाळत असल्याचं पहायला मिळत आहे.

बर्फाळ प्रदेशातील हिम नदी असल्याचा भास इंद्रायणी पाहिल्यास येतो. या प्रदूषित पाण्यामुळे वारकाऱ्यांसह आळंदीकरांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. आळंदी देवस्थानकडून ही इंद्रायणी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आणला होता. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त कधी होते याकडे सर्वांचे लक्ष आहे. आळंदीत दरवर्षी आषाढी वारी ला लाखो वारकरी दाखल होत असतात. पवित्र मानल्या जाणाऱ्या इंद्रायणीत वारकरी स्नान करतात. सध्या हे जल पवित्र नाही. अशी परिस्थिती आहे. काही महिन्यांपूर्वी इंद्रायणीच पाणी प्यायला योग्य नसल्याचे शासनाकडून सांगण्यात आलं होतं.