भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला दिलेल्या धमकीवर खोचक टोला लगावलाय. पवारांनी २ दिवसांपूर्वी दिलेली धमकी अनिल देशमुखांसाठी आहे की अजित पवारांसाठी? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारलाय. ते पिंपरी चिंचवड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या बेनामी संपत्तीचं प्रकरण ४,००० कोटी रुपयांपर्यंत जाणार आहे, असंही म्हटलं.

किरिट सोमय्या म्हणाले, “शरद पवार यांनी २ दिवसांपूर्वीच धमकी दिली. ही धमकी कुणासंबंधात होती. अनिल देशमुख की अजित पवार? मी २ दिवसांपासून विचार करतोय की शरद पवारांना अनिल देशमुख यांच्यावर इतकं प्रेम उफाळून आलंय की अजित पवार यांच्यावरील आयकर-ईडीच्या धाडीनंतर बेनामी संपत्तीबाबत जे कागदपत्र आणि पुरावे बाहेर आले त्याविषयी. त्यातला पहिली रक्कम १०५० कोटी रुपये आहे. वास्तविकपणे ही बेनामी संपत्ती ४,००० कोटी रुपयांवर जाणार आहे.”

किरीट सोमय्या म्हणाले, “सध्या जालना साखर कारखान्याचे दोन मालक आहेत. एक खोतकर परिवार आणि दुसरे मुळे परिवार.त्यातल्या एक भागधारक रुपाली विश्वास नांगरे पाटील या आहेत. विश्वास नांगरे पाटील हे मुबंई पोलीस दलाचे सह आयुक्त आहेत.”

“शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना सांगू इच्छितो की जालना साखर कारखान्याची चौकशी स्टेटमेंट आल्यानंतर महिनाभरात बंद करण्यात आली. मुंबई पोलिसांनी ही सर्व चौकशी बंद करून न्यायालयात ‘क्लोजर रिपोर्ट’ दाखल केला. या सर्व प्रकरणाची एकतर सीबीआय चौकशी करा किंवा मुंबई उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करा.”

हेही वाचा : “दिवाळीनंतर ३ मंत्री आणि ३ जावयांचे फटाके फोडणार”, किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

किरीट सोमय्या म्हणाले, “मुंबईचा एक पोलीस सह आयुक्त बेनामी पद्धतीने साखर कारखाना घेतो. दुसरा पोलीस सह आयुक्त मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेली चौकशी बंद करतो. जून २०१९ मध्ये स्वतः उच्च न्यायालयाने या प्रकरणाचे तपास करण्याचे आदेश दिले होते. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि तोपर्यंत विश्वास नांगरे पाटील यांना नोकरीतून मुक्त केलं पाहिजे.”