आंध्रप्रदेश, कर्नाटक सीमेवरील जंगलातून चंदन तस्करी
पिंपरी- चिंचवड: पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरून करण्यात येत असलेल्या रक्तचंदन तस्करी प्रकरणी मुख्य आरोपीला मालमत्ता विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरून रक्तचंदनाची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर नऊ कोटींच रक्त चंदन पोलिसांनी पकडलं होत. आत्तापर्यंत याप्रकरणी आठ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
मुख्य ‘पुष्पाला’ गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे. राजेंद्र शिंदे आणि तौसीफ जमादार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. आरोपी राजेंद्र विठ्ठल शिंदे हा रक्तचंदनाचा कंटेनर पकडल्यापासून फरार होता. राजेंद्र शिंदे हाच खरा या प्रकरणातील मास्टरमाइंड आहे. ‘पुष्पा’ चित्रपटाला साजेसे हे प्रकरण आहे.
चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन सहकाऱ्यांच्या मदतीने चंदन तोडून तो परदेशात पाठवत अगदी तशाच प्रकारे मुख्य आरोपी राजेंद्र शिंदे करत. आंध्रप्रदेश, कर्नाटक सीमेवर असलेल्या जंगलातून रक्तचंदनाचे कंटेनर भरून, पुणे- मुंबई महामार्गावरून थेट मुंबई आणि तिथून जहाजाद्वारे समुद्रातून दुबईत रक्तचंदनाची तस्करी करत असल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणात रक्तचंदनाची मोठी साखळी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणात आतापर्यंत मालमत्ता विरोधी पथकाने आठ जणांना अटक केली आहे. राजेंद्र शिंदे हा वेगवेगळ्या राज्यात फरार झाला होता. नवी मुंबईमधून वेगवेगळी शहरे, राज्ये बदलली. अखेर रक्तचंदनाच हे प्रकरण शांत झालं असं समजून तो नवी मुंबईमध्ये आला आणि पोलिसांनी साथीदारांसह बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई गुन्हे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या टीमने केली आहे.