पुण्याला कँपातील इराणी बेक ऱ्यांची एक जुनी आणि खरपूस परंपरा आहे. या बेक ऱ्यांनी आपल्या वैशिष्टय़पूर्ण चवीने खवैय्यांच्या जिभेवर कायम अधिराज्य गाजवले. पण पुण्यातच सुरू झालेला बेकरी पदार्थामधील आणखी एक ब्रँड ‘शुद्ध शाकाहारी बेकरी उत्पादने’ हे ब्रीद घेऊन गेल्या १०-१२ वर्षांत पुणेकरांची पसंती मिळवतो आहे. या दोहोंची तुलना जरी शक्य नसली, तरी टपरीपासून माजघरापर्यंत चवीने प्यायल्या जाणारी चहाची रंगत दोन्ही तितकीच वाढवतात हे मात्र खरे! १९९९ मध्ये रविवार पेठेत लहानशा जागेत धडपड करत सुरू झालेल्या या व्यवसायाने उत्तम यश मिळवले आणि आता बंगळुरू, हैद्राबाद आणि अगदी सिंगापूरच्या दुकानांमध्ये मालपाणींचे बेकरी पदार्थ मिळतात.
पुण्यात राहून ‘अमृततुल्य’ चहा न पिणाऱ्या व्यक्ती विरळाच! अगदी कोणत्याही अमृततुल्यात किंवा कोपऱ्यावरच्या चहाच्या टपरीवर चहाबरोबर एक गोष्ट हमखास मिळते, ती म्हणजे ‘मालपाणी’चे ‘बेकलाईट क्रीमरोल’! इतर अनेक चामट क्रीमरोलपेक्षा अगदी वेगळे, कुरकुरीत आणि पूर्णत: शाकाहारी असलेल्या या मालपाणी क्रीमरोल्सनी गेल्या १०-१२ वर्षांत पुणेकरांची पसंती मिळवली आहे. शाकाहारी बेकरी उत्पादने ही संकल्पना घेऊन सुरू झालेल्या मालपाणींच्या बेकरी व्यवसायाने केवळ पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येच नाही, तर राज्याच्या इतरही अनेक भागात बस्तान बसवले आहे. १९९९ मध्ये रविवार पेठेत ७० चौरस फुटांच्या लहान जागेत धडपड करत सुरू झालेल्या या व्यवसायाने चांगले यश मिळवले आणि आता बंगळुरू, हैद्राबाद आणि अगदी सिंगापूरच्या दुकानांमध्येही मालपाणींचे बेकरी पदार्थ मिळतात.
सचिन मालपाणी यांनी जेव्हा बेकरी व्यवसाय सुरू करण्यासाठी पहिले पाऊल टाकले, त्याही वेळी पूर्णत: शाकाहारी बेकरी उत्पादने विकणारी मंडळी खूप कमी होती. पण शाकाहारीच पदार्थाची मागणी करणारे मात्र लोक बरेच होते. खरे तर मालपाणी यांना बेकरीचे ज्ञान नव्हते. १९९९ पूर्वी त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात ८ ते ९ व्यवसाय करून पाहिले होते. परंतु खाद्यपदार्थ बनवण्यातच त्यांना रस होता. त्या वेळी इंटरनेट फारसे वापरले जात नसल्याने माहितीचे स्त्रोत कमी होते. चार ट्रे बसणारा ओव्हन आणि एक मिक्सर हे त्यांचे भांडवल. सुरुवातीला घरगुती नानकटाई, बिस्किटे यावर त्यांनी स्वत: प्रयोग करणे सुरू केले. त्यातील बरेचसे फसले देखील! मग दुसऱ्या एका बेकरीत काम करणाऱ्या व्यक्तीस त्यांनी मदतीला घेतले. पण ‘मालपाणी’ हा ब्रँड काही पटकन रुजला नाही. कधी त्यांच्या उत्पादनांची चव वेगवेगळी असे. मागणी न आल्यामुळे सात-आठ वेळा काम बंद पडले. २००३ पर्यंत हे असे सारे सुरू राहिले. नंतर मात्र त्यांच्या खास क्रीमरोल आणि खारीने हे संघर्षांचे दिवस संपवले.
त्या वेळी मालपाणी रोज केवळ १० ते १५ पाकिटे क्रीमरोल बनवत होते. पण लोकांची पसंती वाढत गेल्यामुळे खप खूप वाढू लागला. रविवार पेठेत मालपाणींचे किराणा माल आणि इतर खाद्यमाल विक्रीचे दुकान आहे. तिथे ते आपली ही स्वत:ची उत्पादने विकत. पुढे लक्ष्मी रस्ता, डेक्कन, स्वारगेट अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडेही ती मिळू लागली. जेव्हा मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडू लागला तेव्हा मालपाणींनी उत्पादनवाढीकडे लक्ष दिले. सातारा रस्त्यावर सिटीप्राईड चित्रपटगृहासमोर असलेल्या वॉशिंग सेंटर शेजारच्या गल्लीत त्यांनी ९०० चौरस फुटांची जागा घेतली आणि तिथे उत्पादन सुरू केले. अजूनही या ठिकाणी मालपाणींची सर्व उत्पादने मिळणारे दुकान आहे. २०१० नंतर आता नऱ्हे-आंबेगावमध्ये ही उत्पादने बनतात.
जसजसा खप वाढू लागला, तसे त्याचे वितरकांचे जाळे वाढले. उत्पादने आकर्षक वेष्टनांमध्ये दिली जाऊ लागली. आधी हे पदार्थ फक्त पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये मिळत होते. पण त्यांच्या चवीमुळे बाहेर गावातील मंडळीही विक्रीसाठी विचारणा करू लागली. क्रीमरोल व खारीसह बिस्किटे, टोस्ट, ब्राऊन टोस्ट, ब्राऊन बिस्किटे, गव्हाची खारी अशी नवी उत्पादने त्यांनी आणली. त्यांचे केकही पूर्णत: शाकाहारी आणि दूध पावडर व व्हे प्रोटिन वापरलेले असतात. आता ते ‘कौस्तुरी’ या ब्रँडसह ‘नमकीन’मध्येही उतरले आहेत. चकली, बाकरवडी, शंकरपाळे, खारी पुरी अशी उत्पादने गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी बाजारात आणली आहे.
स्पर्धेकडे आपण फारसे लक्ष देत नसल्याचे मालपाणी सांगतात. गुजराती-मारवाडी वर्गाबरोबरच मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्ग हा त्यांचा प्रमुख ग्राहक. दर्जात आपण कधीही कसूर करत नाही, असे ते नमूद करतात. मुळात बेकरीत सर्वच गोष्टी शाकाहारी आणणे हे एक आव्हानच असते. पण मालपाणींच्या बेकरीच्या आवारात अंडे आणायचेही नाही, असा दंडक आहे! सुरूवातीला ‘बेकरी शाकाहारी कशी असेल,’ अशी शंका काढणारेही काही ग्राहक त्यांना भेटले. मग मालपाणी त्यांना बेकरी फिरून दाखवत आणि त्यांचा विश्वास बसे.
ही कंपनी २०१० पासून ‘प्रा. लि.’ झाली. आता दररोज ४ ते ४.५ टन माल बनवण्याची त्यांची क्षमता आहे. बंगळुरू आणि हैद्राबादमध्ये त्यांचे पदार्थ मिळतातच, शिवाय २०१४ पासून सिंगापूरच्या काही दुकानांमध्येही मिळतात. आणखीही काही देशांमधून त्यांना मालाच्या विक्रीसाठी विचारणा होत आहे.
पुण्याला कँपातील इराणी बेक ऱ्यांची एक खरपूस परंपरा आहे. या बेक ऱ्यांनी आपल्या वैशिष्टय़पूर्ण चवीने खवैय्यांच्या जिभेवर कायम अधिराज्य गाजवले. तशीच ‘मालपाणी’ने शुद्ध शाकाहारी आणि तितकीच चवदार उत्पादने विकणारी बेकरी म्हणून आपली वेगळीच ओळख तयार केली. या दोहोंची तुलना जरी शक्य नसली, तरी टपरीपासून माजघरापर्यंत चवीने प्यायल्या जाणाऱ्या चहाची रंगत दोन्ही तितकीच वाढवतात हे मात्र खरे!
sampada.sovani@expressindia.com