साहित्य संमेलनातील मुलाखतीत शरद पवार यांचे परखड मत
बाळासाहेब जवळकर,
ग्यानबा-तुकाराम साहित्यनगरी (पिंपरी)
वेगळ्या विदर्भाची मागणी मराठी माणसाची नाही तर मूठभर धनदांडग्यांची आहे. तो घटक बहुतांशी अमराठी आहे. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा घेऊन निवडणुका लढवणारांचा पराभव विदर्भातील बहुसंख्य मराठी भाषकांनीच केला आहे. महाराष्ट्रापासून वेगळे होण्याची भावना विदर्भातील मराठी माणसांमध्ये नाही, असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी िपपरीत साहित्य संमेलनात दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फ. मुं. शिंदे, माजी खासदार प्रा. जनार्दन वाघमारे व माजी आमदार उल्हास पवार यांनी पवार यांची मुलाखत घेतली. शाळेतील खोडकरपणा, आईविषयीची कृतज्ञता, महाराष्ट्र िपजून काढणारे दौरे, सत्तेत आल्यानंतर महिला आरक्षण व महिलांना संपत्तीत वाटा देण्याचा निर्णय, संरक्षण खात्यात महिलांना संधी, नामांतर, वेगळा विदर्भ, मराठवाडय़ाचा रखडलेला विकास आदी विविध मुद्दय़ांवर दिलखुलास उत्तरे देत पवारांनी आयुष्याचा पट पुन्हा नव्याने उलगडून सांगितला.
वेगळा विदर्भ आणि मराठवाडय़ातील विकासाविषयीच्या प्रश्नावर पवार म्हणाले, की वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. मात्र वेगळ्या विदर्भाचा मुद्दा घेऊन ज्यांनी-ज्यांनी निवडणुका लढवल्या, काही अपवाद वगळता, त्यांचा पराभव झाला आहे आणि हा पराभव विदर्भातील बहुसंख्य असलेल्या मराठी भाषकांनीच केला आहे. मूठभर धनाढय़ मंडळींच्या माध्यमातून वेगळ्या विदर्भाची मागणी पुढे केली जाते. महाराष्ट्रापासून वेगळे होण्याची भावना विदर्भातील मराठी माणसांमध्ये नाही. काही गोष्टी राजकीय स्वार्थामुळे होत असतील, असेही ते
म्हणाले. मराठवाडय़ात विकासाची अस्वस्थता जाणवते. तो कळीचा मुद्दा आहे. नैराश्याची परिस्थिती निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यशवंतरावांचा सभ्यपणा आडवा..
पंतप्रधान होण्याची संधी यशवंतराव चव्हाणांना होती. तेव्हा त्यांनी इंदिरा गांधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतो, अशी भूमिका घेतली. लालबदादूर शास्त्री यांचे निधन झाल्यानंतर यशवंतरावांनी पंतप्रधान व्हावे, असे सर्वाना वाटत होते. समर्थकांसमवेत त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली, त्यात मीही होतो. इंदिरा गांधी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेऊ, असे यशवंतरावांना वाटत होते. मात्र तसे करू नये, अशी माझी भूमिका होती. तरीही ते इंदिरा यांच्याकडे गेले. सहा तासांचा अवधी इंदिरा यांनी मागून घेतला. त्या स्वत:चे नाव पुढे करतील, अशी भीती आपण व्यक्त केली, तेव्हा ते माझ्यावरच रागावले होते. थोडय़ाच वेळात इंदिराजींचा चव्हाणांना दूरध्वनी आला आणि त्यांनी स्वत: पंतप्रधान होत असल्याचे स्पष्ट केले. यशवंतरावांचा सभ्यपणा आणि सुसंस्कृतपणा आडवा आल्याने महाराष्ट्रासाठी चालून आलेली पंतप्रधानपदाची संधी हुकली, असे वाटते, असे पवारांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mammaries of yashwantrao chavan said by sharad pawar
First published on: 18-01-2016 at 01:52 IST