पुणे : प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडने गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या सहकार्याने पौडजवळील मांदेडे गावाला शून्य कार्बन उत्सर्जन आणि पर्यावरणीय आव्हानांचा सामना करणारे बनविण्यासाठी विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. याद्वारे पाणी, ऊर्जा, कचरा या क्षेत्रात काम सुरू असून, त्यातून गावकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा घडविण्यात येत आहेत.

या प्रकल्पाबद्दल प्राज फौंडेशनचे विश्वस्त अतुल मुळे म्हणाले की, हा प्रकल्प दीड वर्षापूर्वी सुरू झाला असून यानंतर गावात बरेच बदल झाले आहेत. त्यात ५० टक्के घरांमध्ये प्रदूषणविरहीत स्वयंपाकासाठीच्या चुली बसविण्यात आल्या. या चुलींच्या वापरामुळे इंधन म्हणून वापरण्यात येणाऱ्या सरपणामध्ये तसेच धुराच्या उत्सर्जनामध्ये जवळजवळ ५० टक्के घट झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. वीज वापरातून होणारे स्कोप २ उत्सर्जन कमी करण्याच्या पथदर्शी प्रकल्पाचा एक भाग म्हणून गावातील सुमारे १० टक्के घरांवर सौर पॅनेल बसविण्यात आले आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या प्रकल्पाला गती देत तो यशस्वीरीत्या पूर्ण करण्यावर आमचा भर आहे. या प्रकल्पांतर्गत सोलर पॅनल बसविण्यासाठी ग्रामस्थांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे.

आणखी वाचा-केंद्रीय मंत्री मोहोळांच्या पुण्यातील विमानतळ नापासवरून पास! नेमकं काय घडलं जाणून घ्या…

जल व्यवस्थापन प्रकल्पाच्या माध्यमातून तीन साखळी बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे उन्हाळा संपेपर्यंत पाण्याची उपलब्धता असेल, याची काळजी घेण्यात आली आहे. याबरोबरच भूजल पुनर्भरण होण्यासही मदत झाली असून, विहिरी व कूपनलिकांमधील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होत आहे. या प्रकल्पाचे यश मोजण्यासाठी सविस्तर अभ्यासही सुरू आहे. शिवाय टेक्निकल हायड्रो जिओलॉजिकल अभ्यासही करण्यात आला असून जलस्रोतांचे मॅपिंग पूर्ण झाल्याने आता या हिवाळ्यात पाणलोट व्यवस्थापन उपक्रम सुरू होणार असल्याचे मुळे यांनी नमूद केले.

आणखी वाचा-जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या फळभाज्या झाल्या महाग ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कचरा व्यवस्थापन अन् सांडपाणी पुनर्वापर

गावातील मुख्य वाडीमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून याद्वारे नैसर्गिकरीत्या ग्रे वॉटर झालेल्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नैसर्गिक उपाययोजना राबविल्या जात आहेत. यामुळे गावातील संपूर्ण सांडपाण्यावर प्रक्रिया होणार असून, यासाठी कोणत्याही ऊर्जेची गरज भासणार नाही. लवकरच गावातील इतर वाड्यांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येईल. घरगुती स्तरावरील सेंद्रिय कचऱ्यावर घरातच प्रक्रिया करणे सुरू करण्यात आले असून त्यासाठी कंपोस्टरसारख्या सुविधा ग्रामस्थांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.