पीएमपीसाठी एक हजार गाडय़ांची खरेदी अशोक लेलँड कंपनीकडून कर्जाऊ स्वरूपात घेण्याच्या प्रस्तावाला काँग्रेसने विरोध केला असून बुधवारी होणाऱ्या पीएमपी संचालकांच्या बैठकीपुढे काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव म्हणजे पीएमपीला शेकडो कोटींचा तोटा आणि कंपनीचा फायदा असा प्रकार असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
पीएमपीसाठी एक हजार गाडय़ा खरेदीचा प्रस्ताव काही संचालकांनी आणला असून अशोक लेलँड कंपनीला एकरकमी पैसे देण्याऐवजी प्रतिबस प्रतिकिलोमीटर साडेबारा रुपये या दराने सोळा वर्षे पैसे द्यायचे आहेत. मात्र, हा प्रस्ताव मंजूर झाल्यास तीनशे कोटींच्या गाडय़ाखरेदीसाठी पीएमपीला साडेनऊशे कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. त्या शिवाय लेलँड कंपनीला या गाडय़ांवर सात वर्षे जाहिरात करण्याचेही अधिकार मिळणार असून त्यातून कंपनीला शेकडो कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. तसेच सोळा वर्षांनंतर या गाडय़ा आयुर्मान पूर्ण झाल्यामुळे आपोआपच बाद होणार आहेत.
हा संपूर्ण प्रस्ताव पीएमपीचे मोठे आर्थिक नुकसान करणारा असल्यामुळे त्याला काँग्रेसचा विरोध असल्याचे विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे यांनी मंगळवारी सांगितले. त्यामुळेच पीएमपी संचालकांच्या बैठकीपुढे काँग्रेसचे कार्यकर्ते निदर्शने करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
प्रस्ताव पीएमपीच्या तोटय़ाचा
अशा प्रकारे गाडय़ा खरेदी झाल्यास पीएमपीची सेवा कोलमडून पडेल आणि प्रवाशांना अधिक त्रास होईल, अशी भीती व्यक्त करून पीएमपी प्रवासी मंचनेही या प्रस्तावाला विरोध केला आहे. हा प्रस्ताव संचालकांनी फेटाळून लावावा, अशीही मागणी मंचचे जुगल राठी आणि विवेक वेलणकर यांनी केली आहे. राज्य शासन सीएनजी गाडय़ांच्या वापराचे आदेश देत असताना संबंधित कंपनीकडून डिझेलवर चालणाऱ्या गाडय़ांची खरेदी का केली जात आहे, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
 स्थायी समितीमध्येही मंगळवारी पीएमपीच्या दुरवस्थेवर चर्चा झाली. गाडय़ा बंद पडण्याचे तसेच ई-तिकिटांची यंत्रे बंद पडण्याचे प्रमाण वाढल्याचे कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीण अष्टीकर यांनी या वेळी मान्य केले. तसेच एक हजार गाडय़ांची खरेदी केल्यास चालक-वाहकांची जेवढी संख्या लागेल, तेवढे चालक-वाहक कंपनीकडे नसल्याचेही त्यांनी सांगितले.