पुणे : वीजचोरी रोखण्यासाठीची मोहीम तीव्र करण्यासह वीजचोरांविरोधात फौजदारी कारवाई करण्याचे आदेश महावितरणचे व्यवस्थापकीय-संचालक लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी दिले. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी थकबाकी वसुलीला वेग देण्याची सूचनाही त्यांनी केली.
चंद्र यांनी महावितरणच्या ‘प्रकाशभवन’ कार्यालयात पुणे प्रादेशिक विभागातील विविध कामांचा आढावा घेतला. त्या वेळी ते बोलत होते. संचालक सर्वश्री सचिन तालेवार, योगेश गडकरी, राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक परेश भागवत, दिनेश अग्रवाल, पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनील काकडे, धर्मराज पेठकर, स्वप्निल काटकर, पंकज तगलपल्लेवार या वेळी उपस्थित होते.
‘महावितरणकडून मागेल त्याला वीजजोडणी देण्यात येते. तरीही, ग्राहकांकडून आकडे टाकून किंवा वीज मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केली जात असेल, तर ती खपवून घेतली जाणार नाही. वीजचोरीविरुद्धची मोहीम आणखी कठोर करण्यात येणार आहे. वीजचोरांविरोधात थेट फौजदारी कारवाई करावी आणि देयकांच्या थकबाकी वसुलीला वेग देण्यात यावा,’ असे निर्देश चंद्र यांनी दिले.
चंद्र म्हणाले, ‘वीजहानी कमी करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी वीजचोरीविरुद्ध कठोर मोहीम आवश्यक आहे. घरगुती, व्यावसायिक आणि इतर कोणत्याही प्रकारांतील ग्राहक मीटरमध्ये फेरफार करीत असेल, तर त्याच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करा. थकबाकीमुळे वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित झाला आहे, अशा वीजजोडण्यांची तपासणी करा.’
‘पश्चिम महाराष्ट्रामध्ये विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नवीन वीजजोडण्या आणि वीज भार वाढवून देण्याचे काम नियमाने दिलेल्या मुदतीतच झाले पाहिजे. मागणीप्रमाणे वीज उपलब्ध असताना, नवीन वीजजोडण्यांना विलंब होत असल्यास सहन केले जाणार नाही. सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीज यंत्रणा सक्षम करण्याची मागणी होण्यापूर्वीच संबंधित कार्यालयांनी उपाययोजना करून वीजयंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी महावितरणकडे निधीची आणि साधन सामग्रीची कोणतीही कमतरता नाही,’ असेही चंद्र यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून छतावरील सौर प्रकल्प कार्यान्वित झालेल्या ग्राहकांच्या वीजदेयकासंबंधी तक्रार असल्यास त्याचे विनाविलंब निराकरण करण्याचे आणि त्यात दिरंगाई झाल्यास गंभीर नोंद घेणार असल्याचे चंद्र यांनी सांगितले.
महावितरणच्या थकबाकीत वाढ
गेल्या काही महिन्यांपासून वीजदेयकांच्या थकबाकीमध्ये वाढ होत असल्याची कबुली महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली. ‘वाढलेली थकबाकी गंभीर आहे. थकबाकीच्या वसुलीला आणखी वेग देण्यात यावा. अचूक देयकांचे प्रमाण वाढविण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात. प्रत्येक युनिटचे मोजमाप झाले पाहिजे,’ असे चंद्र म्हणाले.