प्रा. शरद देशपांडे
‘पंचवटी’मधील ‘खगोल’ या इमारतीत आम्ही २००४ मध्ये राहायला आलो. जयंतराव आणि मंगला नारळीकर यांचे घर दुसऱ्या मजल्यावर, तर आमचे चौथ्या मजल्यावर. जाता-येता काही ना काही बोलणे व्हायचे, एकमेकांना हसून प्रतिसाद दिला जायचा. नारळीकर या नावाभोवती असलेल्या वलयामुळे असलेला औपचारिकपणा हळूहळू दूर झाल्यामुळे आमच्या शेजारपणाच्या नात्यातील दूरस्थपणाही कमी झाला होता. क्वचित काही कामानिमित्त त्यांच्या घरी जाणे होऊ लागले. आमच्या खगोल हाउसिंग सोसायटीचे नारळीकर हे प्रवर्तक. सोसायटीच्या सभांमध्ये त्यांच्या उपस्थितीचे कधी दडपण येत नसे. पण त्यांच्या येण्याने एक भारदस्तपणा येत असे. सोसायटीच्या सर्व सभासदांना त्यांचा आदरयुक्त धाक असे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला सोसायटीच्या आवारातील ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाच्या वेळी पायजमा व झब्बा घालून जयंतराव आणि एखादी साधीच साडी नेसून मंगलाताई आल्या, की एक वेगळाच भारदस्तपणा यायचा.
निवृत्त झाल्यानंतरही ते नियमितपणे अगदी दोन वर्षांपूर्वीपर्यंत दररोज सकाळी नऊ वाजता ‘आयुका’त जात असत. काटेकोरपणे वेळ पाळणे हा जयंतरावांचा स्थायिभाव. अनेक वर्षे केंब्रिजला राहिल्यामुळे त्यांच्या सवयी खास ब्रिटिश वळणाच्या म्हणता येतील, अशा होत्या. चार वाजता चहा, नंतर फिरायला जाणे, नंतर सातच्या बातम्या ऐकणे. त्यात व्यत्यय आलेला त्यांना आवडत नसावा. नेमके व मार्मिक बोलणे, राजकीय अथवा सामाजिक अशा कोणत्याही वाद असलेल्या विषयावर न बोलणे, वेळेचा जास्तीत जास्त उपयोग करणे, येईल त्या समारंभाचे आमंत्रण न स्वीकारणे हे त्यांचे व्यक्तिविशेष कोणालाही जाणवत असत. गणितीय काटेकोरपणा हा त्यांच्या वैचारिक शिस्तीचा भागच होता. त्यांना जेव्हा केंब्रिजची शिष्यवृत्ती मिळाली, तेव्हा डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन (जे नंतर राष्ट्रपती झाले) यांनी विद्यार्थिदशेतल्या जयंतला ‘रेफरन्स लेटर’ दिले होते; हे त्यांनी मला एकदा अगदी जाता जाता सहज सांगितले होते.
जयंतराव व मंगला नारळीकर हे एक अद्वैत होते. म्हणूनच जयंतरावांची आठवण येताना मंगलाताईंच्या आठवणी येणे स्वाभाविक आहे. स्वतःची ढासळत जाणारी प्रकृती सांभाळत मंगलाताईंनी अगदी शेवटपर्यंत जयंतरावांना रोज संध्याकाळी सोसायटीच्या आवारात फिरवणे, त्यांना आवारातच ठेवलेल्या स्टेशनरी सायकलवर बसण्यास व सायकल चालविण्यास मदत करणे, सोसायटीतील बाकावर बसायला सोपे जावे म्हणून त्यांच्या मागे मागे एक जाड उशी घेऊन फिरणे हे सर्व त्यांनी अगदी जणू मातेच्या ममतेने केले. ‘लवंग-लतिका’ हा सासूबाईंनी त्यांना शिकवलेला पदार्थ त्या दिवाळीत आम्हाला आवर्जून आणून देत असत. माझी पत्नी मेधा हिला त्या अनेकदा मोगऱ्याची फुले आणून देत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी स्वतः शिवलेली मुखपट्टी माझ्या पत्नीला दिली होती.
एकदा मंगलताई व जयंतराव घरी आले आणि ‘आमचा अमेरिकेतील जावई आलोक (मोठी मुलगी गीताचा नवरा) पुण्याला येणार आहे. त्याला तत्त्वज्ञानामध्ये रस आहे. पण, तो जे बोलतो ते आम्हाला कळत नाही. तेव्हा तुम्ही त्याच्याशी बोलाल का?’ असे मला विचारले. नंतर आलोक, गीता आणि आम्हा दोघांची एक स्वतंत्र मैत्री निर्माण झाली. आलोक आणि मी ‘नारळीकरांच्या विज्ञानकथा व त्यामागचे विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ असा एक प्रकल्प करायचे ठरविले. त्यासाठी नारळीकरांच्या सर्व कथा एकत्रित अशा हव्या होत्या. एके दिवशी जयंतराव स्वतः पुस्तकांचा गठ्ठा घेऊन घरी आले.
जयंतराव व मंगलाताई २००९ साली शिमल्याला आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये आले होते. एकदा आम्ही चौघे मॉलमध्ये फिरायला गेलो. मंगलाताई व मेधा पुढे आणि जयंतराव व मी मागे असे चाललो होतो. तेव्हा जयंतराव हसून मला म्हणाले, ‘त्या दोघींना पुढे जाऊ देत. मंगलला खरेदी करण्याची हौस आहे. आपण पुस्तकांच्या दुकानात जाऊ.’ त्याप्रमाणे आम्ही मॉलमधील पुस्तकाच्या दुकानात दोघी परत येईपर्यंत निवांत पुस्तके चाळीत बसलो.
शिमल्यातील आमच्या इन्स्टिट्यूटची (पूर्वीचे राष्ट्रपती भवन) नर्सरी बघायला जयंतरावांना व मंगलाताईंना रस होता. तिथे गेल्यावर त्यांनीच आम्हाला अनेक वनस्पती, फुले यांची मूळ नावे व त्यांची वैशिष्ट्ये सविस्तर सांगितली. जयंतराव व मंगलाताई या आमच्या सोसायटीच्या चैतन्यमूर्ती होत्या.
भारतीय परंपरेत धर्म, अर्थ, काम या तीन पुरुषार्थांचे सार्थक जो करतो तो परिपूर्ण आयुष्य जगतो असे म्हणतात. एकमेकांना साथ देत जयंत व मंगला नारळीकर असे परिपूर्ण आयुष्य जगले आहेत.
(लेखक नवी दिल्ली येथील ‘आयसीपीआर’चे नॅशनल फेलो असून, डॉ. नारळीकर राहत असलेल्या सोसायटीत ते राहतात.)