सतत पडणाऱ्या पावसामुळे धरण क्षेत्राच्या पाणी पातळीत वाढ होत असून नदीत पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नदीतील पाणीपातळीची वाढ लक्षात घेता नदीकाठच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पिंपरी पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
सद्यस्थितीत पाऊस जास्त प्रमाणात पडतो आहे. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. धरणातून देखील पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी आपल्या वस्तू तसेच जनावरांची काळजी घ्यावी.

हेही वाचा : पुणे : खडकवासला धरणातून हंगामातील सर्वाधिक विसर्ग ; मुठा नदीत ३० हजार क्युसेकने पाणी सोडले

संभाव्य धोका विचारात घेता कोणीही नदीपात्रात उतरू नये. पालिकेने आवश्यक आपत्कालीन यंत्रणा तैनात ठेवली आहे. घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे. पूरपरिस्थिती उद्भवल्यावर नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. पालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष कार्यरत आहे, असे आयुक्तांनी सांगितले.