पिंपरी : भगवानगडाचे महंत ह. भ. प. नामदेव महाराज शास्त्री यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी आणि वाल्मीक कराडशी संबंध यावरून अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणारी भूमिका मांडल्याने मराठा समाजामध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शास्त्री यांचे देहूतील भंडारा डोंगर येथे होणारे कीर्तन रद्द करण्याचा निर्णय श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टने घेतला आहे.

श्री संत तुकाराम महाराज यांच्या जन्मदिनामित्त भंडारा डोंगर येथे  २ ते ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  या साेहळ्यामध्ये माघ शुद्ध दशमीच्या दिवशी (७ फेब्रुवारी) भगवानगडाचे महंत ह. भ. प. नामदेव महाराज शास्त्री  यांची कीर्तन सेवा आयोजित केली होती. परंतु, शास्त्री यांनी मंत्री मुंडे यांची पाठराखण करण्याची भूमिका मांडल्याने मराठा समाजाने त्यांच्या कीर्तनाला विरोध केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत अखंड मराठा समाजाने भंडारा डोंगर स्ट्रटला पत्र देऊन शास्त्री यांचे कीर्तन रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच तळेगाव एमआयडीसी पोलिसांनीही शास्त्री यांचे कीर्तन आयेजित केल्यास मराठा समाजाकडून आंदोलन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे पत्र भंडारा डोंगर ट्रस्टला दिले. त्यानंतर ट्रस्टने शास्त्री यांचे सहकारी ह.भ.प. विष्णूपंत खेडकर यांच्याशी चर्चा केली. चर्चेअंती शास्त्री यांची कीर्तन सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. माघ शुद्ध दशमीदिवशी डो. सुदाम महाराज पानेगावकर यांची कीर्तन सेवा आयाेजित केली आहे.