शहरात अनेक बडय़ा बांधकाम व्यावसायिकांचे नवे प्रकल्प ज्या ज्या भागांमध्ये मंजूर झाले आहेत, त्याच भागात महापालिकेने तब्बल २३१ कोटी रुपये खर्चाचे सिमेंट काँक्रिटचे रस्ते बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. निधीअभावी विकासकामे थांबवणाऱ्या महापालिकेने बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांशेजारीच नवे रस्ते करण्याचा जो योगायोग साधला आहे, त्याबाबत गेले काही दिवस चर्चा होती. मात्र आता या प्रस्तावासाठी थेट निविदा मागवण्याचा डाव प्रशासन खेळत असल्याचे पत्रच आयुक्तांना देण्यात आले आहे.
निधी नसल्यामुळे शहरातील अनेक विकासकामे महापालिकेने थांबवली आहेत, तर दुसरीकडे तब्बल २३१ कोटी रुपये खर्च करून सिमेंट काँक्रिटचे आठ रस्ते नव्याने बांधण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. मुख्य सभेची मान्यता न घेताच ही प्रक्रिया राबवण्याचाही डाव खेळला जात असून मुख्य सभेपुढे हा विषय न आणता परस्पर कोणतीही प्रक्रिया करू नये, असे पत्र काँग्रेसचे प्रदेश सचिव, नगरसेवक संजय बालगुडे यांनी मंगळवारी आयुक्तांना दिले. निधी नसल्यामुळे आधी काम आणि नंतर पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने परतफेड या तत्त्वावर (डिफर्ड पेमेंट) हे रस्ते तयार करण्याची योजना आहे.
डिफर्ड पेमेंटने रस्ते तयार करण्यासाठी शहरातील ६० रस्त्यांची निवड करण्यात आली होती. ती यादी अंदाजपत्रकात आहे. मात्र त्यातील आठच रस्ते का निवडले गेले याचे उत्तर प्रशासनाकडे नाही. ते कोणाच्या सांगण्यावरून का कोणाच्या दबावाने निवडले हे स्पष्ट व्हायला हवे, अशीही मागणी बालगुडे यांनी केली आहे. हे आठ रस्ते फक्त बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी केले जात आहेत. या रस्त्यांच्या कामासाठी खर्च महापालिकेचा आणि फायदा बांधकाम व्यावसायिकांचा असा प्रकार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे परस्पर निविदा मागवू नका, अशीही मागणी बालगुडे यांनी या पत्रातून केली आहे.
या रस्त्यांची रुंदी २४ ते ८४ मीटर इतकी असेल. कात्रज, सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक परिसर, महमंदवाडी, वारजे उड्डाणपूल ते चांदणी चौक महामार्गाच्या दोन्ही बाजू, वडगाव महामार्गालगतच्या दोन्ही बाजू, धायरी, कोंढवा बुद्रुक आणि हडपसर ते मुंढवा परिसर या आठ प्रमुख भागातील हे रस्ते आहेत. हे रस्ते डिफर्ड पेमेंटने करण्याची प्रक्रिया केल्यास दरवर्षी ४६ कोटी ३० लाख रुपयांप्रमाणे पुढील पाच वर्ष पैसे द्यावे लागणार आहेत.
काय आहे रस्त्यांची योजना.?
- – आठ रस्त्यांसाठी २३१ कोटींचा खर्च
- – पैसे नसल्याने आधी काम करून घेणार
- – नंतर पाच वर्षांत रकमेची परतफेड
- – नव्या बांधकामांना हे रस्ते पूरक ठरणार