पुणे : बेकायदा वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी कोंढवा परिसरात पकडले. त्यांच्याविरुद्ध बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका नियोजित गृहप्रकल्पाच्या ठिकाणी चौघेजण मजुरी करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांनी देशात कसा प्रवेश केला, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे.

स्वपन निधुभूषण मंडल (वय ३९), मिथुनकुमार दिलीप मंडल (वय ३१), रणधीरकुमार मंडल (वय ३७) आणि दिलीप निमाई मंडल (वय ३८, सर्व सध्या रा. केईसी लेबर कॅम्प, मूळ रा. बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार तानाजी चंद्रसेन सरडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काेंढव्यात चार बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती. त्यानंतर याबाबतची माहिती कोंढवा पोलिसांना कळविण्यात आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करून चाैघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कागदपत्रांबाबत विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांच्याकडे ओळखपत्र किंवा कागदपत्रे सापडली नाहीत. चौकशीत चौघांनी बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली. चौघे जण गेल्या तीन ते चार महिन्यांपासून वास्तव्य करत असल्याची मााहिती तपासात मिळाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चार महिन्यांपूर्वी चौघांनीही बांगलादेश सीमेवरून घुसखोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून चार मोबाइल संच आणि सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सुकेशिनी जाधव तपास करत आहेत.