पुण्यातून प्रमुख मार्गावर पूर्वीपेक्षा दुप्पट भाडे पुणे : डिझेलची दरवाढ आणि वाहनांच्या सुटय़ा भागासह महागलेल्या करांमुळे खासगी वाहतूकदारांनी दिवाळीत बसच्या भाडय़ात मोठी वाढ केली आहे. पुण्यातून प्रमुख मार्गावर पूर्वीपेक्षा दुपटीहून अधिक भाडेवाढ झाली आहे. इंधनासह सर्वच प्रकारच्या महागाईने वाहतूकदार अडचणीत आला असल्याने ही भाडेवाढ करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण वाहतूकदारांकडून देण्यात येत आहे. प्रवाशांना मात्र त्याचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. डिझेलचे दर गेल्या काही दिवसांत झपाटय़ाने वाढले आहेत. पुण्यात बुधवारी प्रतिलिटर दर १०४ रुपये होता. वाहतूकदारांच्या माहितीनुसार वाहनांत वापरल्या जाणाऱ्या बॅटऱ्या, वाहनांचे सुटे भाग, देखभाल-दुरुस्ती आणि शासकीय करातही गेल्या काही दिवसांत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. करोनातील टाळेबंदीच्या काळात अनेक दिवस बस बंद होत्या. त्यामुळे या काळात बँकांचे हप्ते, गाडय़ांची देखभाल आणि कामगारांना काही प्रमाणात वेतन देण्याबाबत अडचणींचा सामना करावा लागल्याच्या वाहतूकदारांच्या तक्रारी आहेत. त्यानंतर डिझेल आणि इतर गोष्टींची महागाई झाल्याने व्यवसायच अडचणीत आल्याने दरवाढीशिवाय पयार्य नसल्याचे मत महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी व्यक्त केले. पुणे बस अॅण्ड कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे यांनीही गेल्या आठवडय़ात पुण्यातील संघटनेच्या अधिवेशनात भाडेवाढ जाहीर केली. दरवाढीचा थेट भुर्दंड प्रवाशाला सोसावा लागणार आहे. सर्वच प्रकारातील खासगी बसच्या दरात वाढ करण्यात आली असून, ३० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक भाडे प्रवाशांना द्यावे लागणार आहे. काही महत्त्वाच्या मार्गावर दिवाळीच्या कालावधीत दुपटीपेक्षा अधिक भाडेवाढ झाली आहे. पुण्यातून विदर्भात प्रामुख्याने नागपूर, त्याचप्रमाणे गोवा, अहमदाबाद, हैदराबाद, इंदूर आदी मार्गाला चांगली मागणी असते. दिवाळीच्या दिवसांत ही मागणी वाढते. याच काळात ही दरवाढ करण्यात आली आहे. प्रवाशांकडून या दरवाढीबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. करोनाच्या काळापासून गेल्या १८ महिन्यांत खासगी वाहतूकदार आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आहेत. त्यातच डिझेलच्या वाढीने व्यावसायाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे भाडेवाढ करण्यात आली असून, दिवाळीत प्रवाशांचा आर्थिक बोजा वाढणार असला, तरी व्यावसायिकांचा नाइलाज आहे. दिवाळीत पुणे-मुंबईतून दुसरीकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक असते, पण परतताना प्रवासी नसतात. त्यामुळेही दरवाढ करावी लागते. - बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटना रिक्षा भाडेवाढीला स्थगिती ; दिलेली वाढ रिक्षा संघटनांना अमान्य पुणे : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जाहीर केलेल्या रिक्षा भाडेवाढीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती प्राधिकरणाचे सदस्य सचिव आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित िशदे यांनी दिली. देण्यात आलेल्या भाडेवाढीला रिक्षा संघटनांकडून आक्षेप नोंदविण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या १२ ऑक्टोबरला झालेल्या बैठकीमध्ये पुणे, िपपरी-चिंचवड आणि बारामतीमध्ये रिक्षांना खटुआ समितीच्या शिफारशींनुसार भाडेवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पहिल्या दीड किलोमीटरसाठी १८ रुपयांऐवजी २० रुपये, तर त्यापुढे प्रत्येक किलोमीटरसाठी १२.१९ रुपयांऐवजी १३ रुपयांची भाडेवाढ दोण्यात आली होता. रिक्षाचे नवे भाडे ८ नोव्हेंबरपासून लागू केले जाणार होतो. मात्र, गेल्या काही दिवसांत रिक्षा संघटनांकडून याबाबत आक्षेप नोंदविण्यात येत होता. रिक्षा पंचायत, आम आदमी रिक्षा संघटनांनी याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले होते. दिलेली भाडेवाढ कमी असल्याचे मत संघटनांनी नोंदविले होते. निर्णयाचा पुरर्विचार करण्याची मागणी नोंदविण्यात आली होती. त्यानुसास आधीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. प्राधिकरणाच्या पुढील बैठकीत भाडेवाढीबाबत पुनर्विचार करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.