पुणे : जैन बोर्डिंग प्रकरणानंतर आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणाच्या मुद्द्यावरून आंबेडकरी संघटनांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना लक्ष्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या मागणीवरून आंबेडकरी संघटनांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर सोमवारी ठिय्या आंदोलन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना केंद्रीय राज्यमंत्री मुुरलीधर मोहळ यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे चित्र आहे.

आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत. भारतीय जनता पक्षासह सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. मात्र, भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक झाल्याने भाजपसमोरील अडचणीत वाढ झाली आहे.

पुणे स्थानकाजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण्याची मागणी आंबेडकरी संघटनांनी केली होती. स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी मालधक्का चौकातील ८ हजार ९०० चौरस मीटर जागा आरक्षित करण्यात आली होती. मात्र, ही जागा खासगी कंपनीला देण्यात आल्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समितीने आंदोलन केले. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आठ दिवसांत आरक्षित जागेचा करार रद्द करून, ती जागा स्मारकाच्या विस्तारीकरणाला देण्याचा आदेश काढण्याचे आश्वासन दिले होते.

आंदोलनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी़ही मोहोळ यांच्या दूरध्वनीवरून संपर्क करत मागणी मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. आता मात्र अडीच महिने उलटूनही या प्रकरणात कोणता निर्णय झाला नाही. त्यामुळे समितीने मोहोळ यांच्यावर फसवणुक केल्याचा आरोप करत ठिय्या आंदोलन केले. समितीचे समन्वयक शैलेंद्र मोरे, दीपक गायकवाड, निता आडसुळे आणि स्वाती गायकवाड या वेळी उपस्थित होते.

‘जवाब दो’ आंदोलन

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी मोहोळ यांनी दिलेला शब्द पाळला नाही. खासगी कंपनीला स्मारकाची जागा देण्यात आली, म्हणून केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्याविरोधात ‘जवाब दो’ आंदोलन करण्यात आले. सोमवारी, (१० नोव्हेंबर) दुपारी तीन वाजता मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयावर समितीने मोर्चा काढला. आता या आंदोलनानंतर ही मागणी मान्य झाली नाही, तर शहरातील विविध भागांमध्ये जाऊन समाजाची फसवणूक कशी झाली? याची माहिती देण्यात येणार आहे. ठिकठिकाणी निषेध सभांद्वारे मोहोळ आणि सत्ताधाऱ्यांविरोधात जनआंदोलन उभारणार आहे,’ असे मोरे यांनी नमूद केले.