Pune Crime News : जानेवारी २०२३ मध्ये पुण्यातल्या दौंड तालुक्यात भीमा नदीतून आणि एका विहिरीतून एकाच कुटुंबातल्या सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला तेव्हा या सातही जणांची हत्या त्यांच्या एका नातेवाईकानेच केल्याची बाब समोर आली. या प्रकरणी पाच जणांसह एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली. हे प्रकरण काय आहे? पोलिसांनी गुन्ह्याची उकल कशी केली? आपण जाणून घेऊ,

पोलिसांच्या FIR मध्ये काय उल्लेख?

पोलिसांच्या FIR नुसार २५ जानेवारी २०२३ च्या दिवशी सब इनस्पेक्टर संजय नागरगोजे यांना १८ जानेवारी २०२३ च्या दुपारी १२.३० ला परगाव येथील एका नदीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळाला. त्यानंतर २० जानेवारी त्याच ठिकाणी एका पुरुषाचा मृतदेह मिळाला. २२ जानेवारी २०२३ ला आणखी दोन मृतदेह मिळाले. त्यातला एक मृतदेह महिलेचा होता. महिलेच्या मृतदेहावरुन पोलिसांना हे समजलं की ती महिला बीडमधल्ये गेवराईची रहिवासी होती आणि तिचं नाव संगीता मोहन पवार असं होतं. पोलिसांनी २०२३ मध्ये तिच्या नातेवाईकांना शोधलं आणि त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी इतर तीन मृतदेहांची ओळखही पटली. ते मृतदेह मोहन उत्तम पवार (संगिता पवारचा नवरा), संगिता आणि मोहन यांचा जावई शामराव फुलवारे आणि मुलगी राणी फुलवारे यांचे होते. शामराव आणि राणी हे दोघंही उस्मानाबाद जिल्ह्यातील हाटोळे गावात राहात होते. मोहन पवार हे त्यांची पत्नी, मुलगी, जावई आणि तीन नातवंडं यांच्यासह नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज इथे राहत होते. मोलमजुरीचं काम करुन हे कुटुंब उदरनिर्वाह करत होतं. सातपैकी चारही मृतदेहांवर कोणत्याही स्वरूपाच्या जखमा नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं होतं.

नातेवाईकांनी केली होती सात जणांची हत्या

पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यानंतर पोलिसांना कळलं की या सगळ्या हत्या या लोकांच्या नातेवाईकानेच केली होती. त्यानंतर या हत्या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्यानंतर हेदेखील कळलं की शामराव आणि राणी यांना तीन मुलं आहेत आणि तिघंही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु केल्यानंतर रितेश, छोटू आणि कृष्णा या तिघांचे म्हणजेच राणी आणि शामरावच्या मुलांचेच मृतदेह होते. त्यामुळे एकाच कुटुंबातल्या सात जणांची हत्या झाली ही बाब समोर आली.

हत्याकांडामागील कारण काय?

आरोपी अशोक पवार याचा मुलगा धनंजय पवार यांचा अपघातात मृत्यू झाला होता. मात्र धनंजयच्या अपघाताला हे पवार कुटुंब कारणीभूत होतं, असा समज आरोपींचा होता. याच रागातून आोरपींनी ही हत्या केली. करणी किंवा काळू जादू यातून हे मृत्यू झाल्याचा अंदाज आधी वर्तवण्यात आला होता. मात्र पोलीस तपासात हा अंदाज खोटा ठरला असून, ठरवून केलेले हत्याकांड असल्याचे उघड झाले आहे. अशोक पवार आणि मोहन हे दोघंही एकमेकांचे चुलत भाऊ होते. मात्र भावाबाबत मनात असलेला राग आणि त्याच्यामुळेच आपला मुलगा गेल्याचा संशय या सगळ्याची जागा सुडाने घेतली आणि अशोक आणि त्याच्या कुटुंबाने मोहन आणि संगिता यांच्यासह त्यांचं सगळं कुटुंब संपवलं. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यासाठी अनेक पथकं तयार केली होती. तपासादरम्यान पोलिसांना काही पुरावे हाती लागले. यावरुन घातपात करुन कुटुंबाची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झालं ज्यानंतर अशोक आणि त्याच्या कुटुंबाला अटक करण्यात आली.

मोहनचं फोन लोकेशन आणि संगिताचं फोन लोकेशन यावरुन काय समजलं?

पोलिसांनी केलेल्या तपासात हे समजलं की मोहनचा फोन १७ जानेवारी २०२३ ला अहिल्यानगरच्या निघोजमध्ये आणि १८ जानेवारी २०२३ ला परगांवमध्ये सक्रिय होता. तर संगिताचा मोबाइल फोन १८ जानेवारीला निघोजमध्ये तर १८ जानेवारीला पुण्यातल्या शिरुरमध्ये ऑन झाला होता. या प्रकरणात पोलिसांचा जो प्राथमिक अंदाज होता त्यानुसार त्यांनी अशोक पवारला या प्रकरणी अटक केली. अशोकचा मुलगा धनंजय याचा मुलगा एका दुर्घटनेत मरण पावला. मात्र अशोकला हे वाटत होतं की त्याच्या मुलाची हत्या मोहनने केली आहे. त्यामुळे अशोक कायमच मोहन आणि त्याच्या कुटुंबाला मी संपवणार असं म्हणायचा अशी माहितीही पोलिसांनी दिली.

अशोक आणि त्याच्या कुटुंबाने सुरुवातीला काही माहीत नसल्याचा केला होता दावा

अधिकाऱ्यांनी अशोक आणि त्याच्या कुटुंबाची चौकशी केली तेव्हा त्यांनी सुरुवातीला हेच सांगितलं की १७ आणि १८ जानेवारीला आम्ही निघोजला आमच्या घरीच होतो. तसंच या हत्या कुणी केल्या? नेमकं काय झालं ते आम्हाला काहीही माहीत नाही. मात्र शिरुरमध्ये संगिताचा फोन सक्रिय कसा होता? ते उत्तर त्यांना देता आलं नाही. यानंतर पोलिसांनी अशोक पवार, शाम पवार, शंकर पवार, प्रकाश पवार आणि कांताबाई जाधव या सगळ्यांना अटक केली. तर एका अल्पवयीन मुलालाही अटक केली. त्या अल्पवयीन मुलाला सुधारगृहात पाठवण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोकचा मुलगा धनंजय याचा मृत्यू वाघोली या ठिकाणी झाला. धनंजय एका रस्ते अपघातात ठार झाला. मात्र अशोकला वाटत होतं की माझ्या मुलाला म्हणजेच धनंजयला मोहन त्याच्या मुलाने मारलं आहे. त्यानंतर अशोकने या कुटुंबाचा सूड घेण्याचं ठरवलं. त्यानुसार अशोकने संधी मिळताच या संपूर्ण कुटुंबावर सूड उगवला. संगिता आणि मोहन यांच्यासह त्यांच्या कुटुंबाची त्याने हत्या केली आणि मृतदेह नदीत फेकले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष सरकारी वकिलांनी काय सांगितलं?

या हत्या प्रकरणी विशेष सरकारी वकील शिशिर हिरय म्हणाले, पोलिसांच्या तपासानुसार आरोपींनी सगळ्यांची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्यांचे मृतदेह नदीत फेकले, या प्रकरणाची सुनावणी बारामती येथील न्यायालयात सुरु आहे. लवकरच ही सुनावणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल धस यांच्या पथकाने आरोपींनी मृतदेह भीमा नदीत नेण्यासाठी वापरलेली चारचाकी गाडीही जप्त केली आहे. तसंच दौंड तहसीलदारांच्या उपस्थितीत पोलिसांनी संगीता, राणी आणि शामराव यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बाहेर काढले होते.