पुणे : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिरे, घाट यांचे पुनर्निर्माण करून हिंदू संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले. त्यांची हीच परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे नेत आहेत,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने पुण्यात ‘युवा प्रेरणा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार हेमंत रासने, शंकर जगताप, योगेश टिळेकर, विक्रांत पाटील, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, शहराध्यक्ष करण मिसाळ, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राजेश पांडे या वेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘औरंगजेबाने उद्ध्वस्त केलेली मंदिरे, घाट यांचे पुनर्निर्माण करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हिंदू संस्कृतीचे पुनरुज्जीवन केले. अहिल्यादेवी यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वेश्वर मंदिराचे पुनर्निर्माण केले. अहिल्यादेवींनी २८ वर्षे राज्य कारभार करताना आत्मनिर्भर होत शस्त्रनिर्मितीचा पहिला कारखाना सुरू केला. महिलांना सैन्यात स्थान देऊन महिलांची पहिली तुकडी स्थापन केली. हाच वारसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालविला आहे.’

‘दुर्दैवाने आपल्याला खरा इतिहास शिकविला गेला नाही. मुघलांचे राज्य जाऊन इंग्रजाची राजवट आली, हे खरे नाही. मुघल आणि इंग्रजांची सत्ता या दरम्यानच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळ्या स्वरूपात चालविले जात होते. अहिल्यादेवींनी २८ वर्षे राज्य केेले. तळागाळातील लोकांचा उत्कर्षाचा प्रयत्न केला,’ असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य पुढे नेण्याचे काम राज्य सरकार करत आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळाने त्यांच्या जन्मगावी, चौंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक घेऊन महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग विकासाचा बृहत् आराखडा तयार केला. तसेच महिलांच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली. त्यातून राज्यात सक्षम अहिल्यादेवी घडवून महाराष्ट्र प्रगतिपथावर नेण्यात येत आहे,’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.या वेळी अनुप मोरे, करण मिसाळ यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिता एकबोटे यांनी केले.