पुणे : शाळा भरल्याची घंटा, वर्गात जाण्याची लगबग, नैमित्तिक प्रार्थना, ‘एकसाथ नमस्ते’ असे म्हणत शिक्षकांना केलेले अभिवादन, विद्यार्थिनी आणि शिक्षिकांच्या हस्ते झालेले सामूहिक दीपप्रज्वलन अशा भारावलेल्या वातावरणात पन्नास वर्षांनी पुन्हा एकदा हुजूरपागा शाळेत रविवारी दहावीचा वर्ग भरला. शंभराहून अधिक विद्यार्थिनींनी शाळेच्या रम्य आठवणींना उजाळा देत स्मरणरंजनाची मैफल सजविली.
विनिता पिंपळखरे, हेमलता देशपांडे, विभावरी ठकार, संध्या देशपांडे, मीना साने यांच्या पुढाकारातून १९७५ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनींनी हुजूरपागा शाळेतील अमृत महोत्सव सभागृहात सुवर्णमहोत्सवी मेळाव्याचे आयोजन केले होते. नारायण पेठेतील हुजूरपागा ही स्वातंत्र्यपूर्व भारतातील फक्त मुलींसाठी असलेली दुसरी शाळा आहे. एसएससी मॅट्रिक ही पद्धती सुरू झाल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या पहिल्या तुकडीच्या स्नेहमेळाव्याला डॉ. अपर्णा जोशी, सुलभा गोरे, जयश्री बापट, उमा वाळिंबे या ज्येष्ठ शिक्षिकांची विशेष उपस्थिती होती.
भारती जोग, मंजूषा दाते, मोहिनी अत्रे, रसिका एकबोटे यांनी चित्रपट, भावगीतांसह, नाट्यगीते सादर केली. त्यांना जयंत साने यांनी संवादिनीची आणि दीपक उपाध्ये यांनी तबल्याची साथसंगत केली. विद्यार्थिनींनी केलेले विविध गुणदर्शन पाहून जणू आपण स्नेहसंमेलन अनुभवतो आहे, असा अनुभव प्रत्येकास आला. सीमाशुल्क विभागातून निवृत्त झालेल्या मीना साने-करमकर तसेच क्रीडा क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या हेमलता देशपांडे यांनी आपापल्या क्षेत्रांतील अनुभव कथन केले.
‘तुमच्यासारखेच मलाही लहान झाल्यासारखे वाटत आहे. तुम्ही विविध क्षेत्रांत घेतलेल्या भराऱ्या पाहून आम्हा शिक्षकांना आनंद आणि कौतुकही आहे. स्वत:साठी वेळ द्या, छंद-आवडी जोपासा. त्यातूनच प्रगती, उन्नती साधा आणि आम्ही आनंदी, उत्साही, सकारात्मक आहोत तशाच तुम्हीही रहा,’ अशा शब्दांत जयश्री बापट यांनी अनुभवाचे बोल सांगितले.
‘तुमची तुकडी आम्हालाही हुरहुर लावणारी होती. त्यावेळी नव्या असलेल्या शिक्षकांवर टाकलेला विश्वास तुम्ही विद्यार्थिनींनी सार्थ ठरवला आणि शाळेच्या लौकिकात भरच घातली. वयाचा ठरावीक टप्पा पार करून तुम्हाला आजीपण लाभले आहे. आपल्या नातवंडांच्या रूपाने तुमच्या हातातील ओल्या मातीला छान आकार देत घडवा,’ अशा शुभेच्छा सुलभा गोरे यांनी दिल्या. कल्याणी केतकर, सुरेखा अण्णेगिरी यांनी शिक्षकांचा परिचय करून दिला. विनिता पिंपळखरे यांनी सूत्रसंचालन केले.