पुणे : ‘देशात साखर उत्पादन क्षमतेत उत्तर प्रदेश पहिल्या, तर महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील लोक महाराष्ट्रात आल्याने आणि खासगी साखर कारखाने वाढल्याने सहकारी साखर कारखान्यांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केले.

साथी किशोर पवार प्रतिष्ठानतर्फे किशोर पवार जन्मशताब्दीवर्षानिमित्त ‘साखर उद्योग कामगार चळवळ-अनुभव व दृष्टी’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, किशोर पवार यांच्या कन्या वंदना पवार, साथी किशोर पवार प्रतिष्ठानाचे अध्यक्ष डाॅ. किरण ठाकूर, उपाध्यक्ष अंकुश काकडे आदी या वेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘महाराष्ट्रातील साखर कारखान्यांपुढे खासगी साखर कारखान्यांचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. उत्तर प्रदेशामध्ये सर्वाधिक क्षमतेचे मोठे साखर कारखाने आहेत. त्यामुळे देशात साखर उत्पादनात ते पहिल्या क्रमांकावर असले, तरी तेथील लोक महाराष्ट्रातच येत आहेत. परिणामी, महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांपुढे खासगी साखर कारखान्यांचे आव्हान निर्माण झाले आहे. तेथील कामगारांमुळे महाराष्ट्रातील कामगारांची पिळवणूक होत आहे. कमी कामगारांमध्ये सर्वाधिक उत्पन्न या सूत्राचा अवलंब केला जात आहे.’

‘कामगार चळवळींना उर्जितावस्था देण्यासाठी संघर्ष करावा लागेल,’ असे सांगून, ‘तुटेपर्यंत संघर्ष ताणायचा, की मध्यममार्गावर थांबायचे हे ठरविता आले पाहिजे,’ असेही पवार यांनी नमूद केले.

‘तेव्हाच्या काळातला तरुण डाव्या चळवळीत असायचा आणि त्यानंतर काँग्रेसवाला व्हायचा. मात्र, आताच्या तरुणांकडे पाहिले, तर विचार करण्याची वेळ आहे. ही तरुण पिढी धर्मकारणात गुंतली आहे. राज्यघटना, लोकशाही पुढे टिकते, की नाही अशी शक्यता निर्माण झाली असून, खूप काम करावे लागणार आहे,’ असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.