पुणे : ‘राज्यातील कारागृहांमध्ये विविध खरेदी करताना पाचशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याची माहिती मुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना देऊनही राज्य शासनाकडून त्यासंदर्भात कोणतीही कारवाई का करण्यात आलेली नाही,’ अशी विचारणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.
राज्यातील विविध कारागृहांमध्ये रेशन, उपाहारगृह आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीमध्ये घोटाळा करण्यात आल्याचे पुढे आले आहे. त्याअंतर्गत येरवडा कारागृहातील घोटाळ्याची माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. आदेश किंवा निविदा प्रसिद्ध होण्याआधीच अडीच कोटी रुपयांची साहित्य खरेदी करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी या माध्मयातून केला आहे.
येरवडा कारागृहाच्या अधीक्षकांनी २१ सप्टेंबर २०२४ साहित्य पुरवठा करण्याचे पत्र दिले. या पत्रामध्ये कारागृहातील कैद्यांसाठी गहू, चहा, तांदूळ, तूरडाळ, हरभरा डाळ, गूळ, साखर, वनस्पती तेल, शेंगदाणे यासह मसाल्याचे पदार्थ आणि अन्य वस्तू पुरवठा करण्याबाबत सांगण्यात आले होते. मात्र, पुरवठा करणाऱ्या ठेकेदारास कारागृह अधीक्षकांनी १९ सप्टेंबर रोजी साहित्य पुरवठा करण्यास सांगितले होते. पुरवठा ठेकेदार आणि अधिकारी यांनी संगनमताने पुरवठा आदेश आणि निविदा प्रसिद्ध होण्याआधीच २ कोटी ५५ लाख ८९ हजार ४४० रुपयांची साहित्य खरेदी केल्याचे आढळून आल्याचा आरोप शेट्टी यांनी केला आहे.