पुणे : ‘हिंसा हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. सभोवतालच्या असंतोषामुळे समाज अस्थिर बनला आहे. अशा वेळी कुठल्याही प्रकारच्या अन्यायाला विरोध करणे आवश्यक आहे. साहित्यिकांनी आपल्या साहित्यकृतींच्या माध्यमातून समाजाला जागृत करणे ही काळाची गरज आहे. असंतोषाचे ऋण मानून बदल घडविण्यास सज्ज होऊ या,’ असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी सोमवारी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित वार्षिक ग्रंथ पुरस्कार कार्यक्रमात अमोल पालेकर यांच्या ‘ऐवज’ पुस्तकाला पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्व पुरस्कारप्राप्त लेखकांच्या वतीने पालेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

ते म्हणाले, ‘वैष्णवीची आत्महत्या, पहलगाममधील २६ जणांची हत्या, जातीयवाद आणि धार्मिक द्वेषातून उद्भवणारी रोजची हिंसा, असे आपल्या उंबरठ्याच्या आतले प्रश्न असोत, किंवा जागतिक पातळीवरची गाझामधील अमानुष हिंसा असो किंवा युक्रेनमधील युद्ध असो… सर्वदूर पसरलेली हिंसा हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झालेली आहे.’

‘एकमेकांशी बोलण्याचा सूरही इतका टिपेचा झालेला आहे, की दुसऱ्याचे म्हणणे कानातही शिरत नाही. त्याचे आकलन होणे, ते समजून घेणे हे तर फारच पुढचे. डावा-उजवा, प्रतिगामी-पुरोगामी, राष्ट्रप्रेमी-राष्ट्रद्रोही अशी द्वंद्वे उभी करून त्यात माणसांना साचेबद्ध करून, आपापल्या कोषांत वावरणाऱ्या समूहांचे जथ्थे एकमेकांना सतत भिडत राहतात आणि ती हिंसा सतत अस्वस्थ करत राहते. काळाच्या कुठल्याही टप्प्यावरचा वर्तमान हा अस्वस्थ करणाराच असतो, असे इतिहास दाखवतो आणि तसा तो असायलाही हवा. तो तसा नसेल तर मानवी समाज एका निश्चल श्वासावर तगून राहील,’ असे पालेकर म्हणाले.

‘लढणे थांबवून हार मानणे मला मान्य नाही. सगळीकडे आबादी-आबाद आहे, असे सतत कानावर पडत असेल, तर प्रत्येकामधील असंतोष जागा व्हायला पाहिजे. उन्मादाच्या धुंदीमध्ये पहुडणारा उत्सवी समाज आपल्याला नकोच आहे. सभोवतालचा असंतोष हा गरजेचा असतो. कारण, त्यातूनच परिवर्तनाची ठिणगी पडते. त्यातूनच संघर्ष उभा राहतो. कोणत्याही अन्यायाला विरोध प्रत्येकाने केलाच पाहिजे, असे मी ठामपणे मानतो. म्हणूनच माझे आत्मकथनही मी ‘विरोध करण्यावर विश्वास असणाऱ्या सर्वांना’ अर्पण केले आहे,’ असे पालेकर यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ते म्हणाले, ‘समाज बदलण्यामध्ये, घडवण्यामध्ये साहित्याचा आणि साहित्यिकांचा मोठा सहभाग असला पाहिजे, असाही माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे ‘असंतोषाने असंतोषी होऊ नकोस’ असे सतत स्वतःला समजावत, मी रोजची लढाई लढायला सज्ज होतो. ती लढाई विचारांची असते, विचारांशी असते. आणि असे सज्ज झाल्यावर आजूबाजूला माझ्यासारखे अनेक लोक दिसत राहतात. एकेकटी लढाई लढत राहणारे एकत्र आले, तर मूल्यांची हत्या होऊ देणार नाहीत. एकमेकांच्या साथीने विवेकवादी विचार पुढे पुढे नेत राहतील आणि आंतरिक स्वास्थ्याकडे आपला प्रवास अथक राहील, असा माझा विश्वास आहे.’