पुणे : पुणे जिल्हय़ातील पुरंदर तालुक्यातील विमानतळाच्या भूसंपादनासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली.त्यावेळी कुंभारवळण या गावातील सर्वेक्षणाचे काम सुरू असताना संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेऊन विमानतळाला जागा देण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शवला.त्यावेळी ग्रामस्थ आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली होती.तर त्यावेळी पोलिसांनी ग्रामस्थांवर सौम्य लाठीमार करून अश्रूधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या होत्या.

त्या घटनेत ग्रामस्थ आणि काही अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले होते.त्यानंतर विरोधी पक्षातील नेतेमंडळीनी ग्रामस्थांची भूमिका जाणुन घेऊन सत्ताधारी महायुतीवर सर्व विरोधी पक्षातील नेत्यांनी टीका केली होती.

त्या सर्व घडामोडी दरम्यान माजी न्यायाधीश बी.जे.कोळसे पाटील यांच्यासह पुरंदर येथील ग्रामस्थांनी शरद पवार यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. त्या ग्रामस्थ आणि शरद पवार यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाली.त्या बैठकीनंतर माजी न्यायाधीश बी.जे.कोळसे पाटील म्हणाले की,पुरंदर येथे होणार्‍या विमानतळास ग्रामस्थांनी विरोध दर्शवला आहे.त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही शरद पवार यांची भेट घेतली.

त्यामध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांनी फोन लावला.मात्र ते फोनवर उपलब्ध होऊ शकले नाही. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला.त्यावेळी शेतकर्‍यासोबत बैठक घ्या आणि त्यांच म्हणण ऐकून घ्या,असे अजित पवार यांना सांगितले.पण शेतकर्‍यांच्या बाजूने निर्णय होईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.