मागील वर्षभर सोयाबीनला हमीभावापेक्षा चांगला बाजारभाव मिळात राहिला. खाद्यतेलाची टंचाई, पोल्ट्री उद्योगामुळे सोयाबीनला वर्षभर मागणी कायम राहिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कापूस आणि कडधान्य पिकांची लागवड टाळून सोयाबीनच्या पेरणीवर जास्त भर दिल्याचे दिसून येत आहे. परिणाम यंदाच्या खरिपात राज्यात विक्रमी क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली आहे. २०१७-१८पासून राज्यात सोयाबीनचे सरासरी क्षेत्र ४१ लाख ४३ हजार ३८२ हेक्टर इतके असते. मागील वर्षी ४४ लाख ४८ हजार ७३१ हेक्टर इतक्या क्षेत्रावर पेरणी झाली होती. यंदा त्यात वाढ होऊन ४७ लाख १० हजार १९० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत यंदा झालेला पेरा ११४ टक्के आहे, अशी माहिती प्राथमिक पेरणी अहवालातून समोर आले आहे. का वाढला सोयाबीनचा पेरा? सोयाबीनचे क्षेत्र मुख्यत्वे करून विदर्भ आणि मराठवाड्यात जास्त असते. सोयाबीनसह अन्य कडधान्य, तेलबिया पिकेही या भागात जास्त असतात. पण यंदा पाऊस उशिरा आल्यामुळे कडधान्य पिकांची पेरणी कमी झाली. जूनअखेर पेरणी न झाल्यास कडधान्य पेरणी फायद्याची ठरत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर कापूस किंवा सोयाबीन पेरणीचा पेरणीचे दोन पर्याय होते. कापसाची कमी उत्पादकता हा महत्त्वाचा प्रश्न सध्या विदर्भ, मराठवाड्यात निर्माण झाला असल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीला प्राधान्य दिले दिल्याचे दिसून येते. सोयाबीनला हमीभावापेक्षा जास्त दर मिळला सोयाबीनचा हमीभाव ३९५० इतका होता. पण, मागील वर्षात सोयाबिनचे दर बारा हजार रुपये क्विंटलपर्यंत गेले होते. वर्षभरात सोयाबीनचा सरासरी दर साडेसात हजार रुपयांच्या घरात होता. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीला प्राधान्य दिलेले दिसून येते.