आपल्या आयुष्यात अचानक एखादी प्रेरणादायी व्यक्ती येते आणि आयुष्यातील सौंदर्याची जाणीव करून देते. सायकलपटू आणि १०५ मॅरेथॉनमध्ये धावणारे श्रीकांत साठे यांची ॲन्जिओप्लॅस्टी झाल्यानंतर रुग्णालयात भेटलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांना एक सल्ला दिला. तो सल्ला होता, आरोग्याकडे अधिक जागरूकतेने पाहण्याचा. या सल्ल्याने आणि त्या भेटीनंतर शस्त्रक्रिया झाल्याचा बाऊ न करता साठे यांनी पळण्याच्या व्यायामात प्रावीण्य मिळवले. ते सायकलपटूही झाले आणि व्यसनाधीनतेपासून दूर राहण्यासाठी जनजागृती करत १९ दिवसांचा पुणे ते कन्याकुमारी असा सायकल प्रवासही त्यांनी केला. येत्या शनिवारी येणाऱ्या तंबाखूसेवनविरोधी दिनानिमित्त श्रीराम ओक यांंनी त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवासाचा अनुभव कसा होता?

पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास घडला त्याला पहिले कारण म्हणजे वयाच्या सदुसष्टाव्या वर्षी पत्नीकडून भेट मिळालेली सायकल. त्या वेळी अगदी सहज मी पत्नीला म्हणालो, की मी सायकलवर कन्याकुमारीला जाईन. त्याआधी सात वर्षे मी वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये पळत होतो. अनेक मॅरेथॉनमध्ये बक्षिसेही पटकाविली होती. सायकलींचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात पन्नास वर्षांनी पहिल्यांदा मी सायकलवर स्वार झालो ते दुकानातून सायकल आणताना. त्यानंतर मग सायकल चालवण्याचा सराव सुरू केला. सरावात किंवा नंतरही पुणे-थेऊर, पुणे-गेट वे ऑफ इंडिया, पुणे-पंढरपूर या प्रवासात कुठेही दमत नव्हतो. पुणे-थेऊर हा प्रवास मी एकट्यानेच केला होता; पण पुढील सगळे प्रवास मी सायकल चालविणाऱ्या ग्रुपतर्फे केले. या सगळ्या सायकल प्रवासात मी आधी पळण्यासाठी केलेला सराव कामी आला. तसेच, या सगळ्या सायकल मोहिमांसाठी सायकल चालवण्याचा सराव सुरू केला. रोज पाच किलाेमीटरपासून सुरुवात करून हळूहळू अंतर वाढवत गेलो. पुणे ते कन्याकुमारी या प्रवासात रोज ऐंशी ते शंभर किलोमीटर सायकल चालवत होतो. या मोहिमेत माझ्याबरोबर सायकलवर संजय कदम होते, तर आमच्यासाठी बॅकअप व्हॅनमधून जितेंद्र होते. या दोघांसह कुटुंब आणि मित्रांच्या सहकार्याने हा १ हजार ७५० किलोमीटरचा सायकल प्रवास आम्ही व्यवस्थित करू शकलो. या सायकलप्रवासाची संकल्पना होती व्यसनमुक्ती. ‘सुदृढ आरोग्यासाठी व्यायामाला जवळ करा आणि व्यसनांना दूर सारा’ हा संदेश जनमानसात पोहोचवत हा प्रवास केला. रोजचे ८० ते १०० किलोमीटर सायकल चालविणे हे आव्हानच होते. पण ते आम्ही पेलले.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आपण उद्दिष्ट साध्य करू शकतो का?

– वयाच्या ४९ व्या वर्षी माझी ॲन्जिओप्लास्टी झाली. म्हटले, तर माझ्यासाठी ही प्रतिकूल परिस्थिती होती. पण, रुग्णालयात भेटलेली ‘ती’ व्यक्ती माझ्यासाठी देवदूत ठरली, असे मला वाटते. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीचा विचार न करता मी दहा किलो वजन आणि पाच इंच पोट कमी करून वयाच्या साठाव्या वर्षी ८२ मिनिटांमध्ये दहा किलोमीटर पळू शकलो होतो. यामध्ये सुयोग्य आहार नक्कीच महत्त्वाचा होता आणि आहे. खरे म्हणजे तुम्ही भीतीला मागे सारलेत, की तुम्ही जिंकूच शकता. आलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ध्येयाचा पाठपुरावा करण्याची गरज असते आणि अडचणींवर मात करण्यासाठी मार्ग शोधत पुढे गेलात, की हतबलता न येता ध्येय गाठता येतेच.

एखादे व्यसन लागू नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी?

– संगतीमुळेच आपण आरोग्यदायी आणि अनारोग्यदायी सवयी लावून घेतो. ‘जैसा संग वैसा रंग’, त्यामुळे व्यसन लागू नये म्हणून योग्य संगत महत्त्वाची आहे.

व्यसन सोडण्यासाठी काय प्रयत्न आवश्यक असतात?

– व्यसन सोडण्यासाठी ते न करण्याची इच्छा आधी महत्त्वाची आहे. त्याबरोबरच आरोग्यदायी सवयी लावून घेण्याची मानसिक तयारी, व्यसन सोडायची इच्छा असलेल्या व्यक्तीचा पुढाकार आणि त्याबरोबरच कुटुंबाचे प्रोत्साहनही आवश्यक असते. एकंदरीतच व्यसनांपासून दूर राहणे आणि आरोग्यदायी जीवन जगण्याचे ध्येय ठेवणे ही काळाची गरज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

shriram.oak@expressindia.com