पुणे : रेल्वे गाड्यांतून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर रेल्वे प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारला आहे. रेल्वेच्या पुणे विभागाने जुलै महिन्यात विनातिकीट प्रवास करणाऱ्या २० हजार १९९ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांच्याकडून तब्बल १ कोटी ५३ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

विनातिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेकडून उपनगरीय सेवा, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करण्यात येते. पुणे विभागात जुलैमध्ये तिकीट तपासणीदरम्यान २० हजार १९९ जण विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून १ कोटी ५३ लाख ४३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच, अनियमित प्रवास करणाऱ्या ८ हजार ४३५ जणांना ४८ लाख ८८ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच, सामानाची नोंदणी न करता घेऊन जाणाऱ्या १५० जणांकडून १५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आणखी वाचा-पेट्रोल पंपचालकांची आर्थिक कोंडी! २०१७ पासून वाढीव कमिशनमध्ये मिळेना

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंह आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांचे नेतृत्वात तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या मदतीने करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे प्रशासनाकडून अशा प्रकारे तिकीट तपासणी मोहीम सातत्याने सुरू आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी योग्य तिकीट घेऊनच प्रवास करावा अन्यथा त्यांना रेल्वे कायद्यांतर्गत दंड भरावा लागेल आणि न भरल्यास तुरुंगवासही होऊ शकतो, असे आवाहन रेल्वेने केले आहे.