दत्ता जाधव
पुणे : देशात २०२२-२३मध्ये विक्रमी अन्नधान्य उत्पादन झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत १४०.७१ लाख टनांनी उत्पादनात वाढ होऊन एकूण अन्नधान्य उत्पादन ३२९६.८७ लाख टन झाल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाने २०२२-२३ या वर्षांतील अन्नधान्य उत्पादनाची अंतिम आकडेवारी जाहीर केली, त्यानुसार देशात एकूण ३२९६.८७ लाख टन अन्नधान्य उत्पादन झाले आहे. त्यात १३५७.५५ लाख टन तांदूळ, ११०५.५४ लाख टन गहू, ५७३.१९ लाख टन पौष्टिक तृणधान्ये, ३८०.८५ लाख टन मका, कडधान्ये २६०.५८ लाख टन, तूर ३३.१२ लाख टन, हरभरा १२२.६७ लाख टन, तीळ ४१३.५५ लाख टन, १०२.९७ लाख टन भूईमूग, १४९.८५ लाख टन सोयाबीन आणि १२६.४३ लाख टन मोहरीचा समावेश आहे.
आणखी वाचा-पुण्याला वाढीव पाणी कोटा मिळणार का… आज होणार निर्णय
३३६.६० लाख कापूस गाठींचे उत्पादन
देशात २०२२-२३मध्ये ३३६.६० लाख गाठींचे (एक गाठ १७० किलो रुई ) उत्पादन झाले आहे. हे मागील वर्षापेक्षा २५.४२ लाख गाठींनी जास्त आहे. तागाचे उत्पादन ९३.९२ लाख गाठीचे (एक गाठ १८० किलो) झाले आहे. यासह देशात २०२२-२३मध्ये एकूण ऊस उत्पादन ४९०५.३३ लाख टन झाल्याचा अंदाज आहे. मागील वर्षी ४३९४.२५ लाख टन उत्पादन झाले होते, त्यात यंदा ५११.०८ लाख टनांनी वाढ झाली आहे.
फलोत्पादन ३५१९.२० लाख टनांवर
देशातील फलोत्पादनातही वाढ झाली आहे. सन २०२२-२३मध्ये ३५१९.२० लाख टनांवर फलोत्पादन गेले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ४७४ लाख टनांनी वाढ झाली आहे. देशात २८१.२० लाख हेक्टरवर लागवड झाली होती. त्यात फळे, फुले, भाजीपाला आणि औषधी वनस्पतींचा यात समावेश आहे. फलोत्पादनाचा हा दुसरा सुधारित अंदाज आहे.