पुणे : ‘विनाकष्टाचे आणि फुकट, ते सर्व निर्धारपूर्वक नाकारा. आपल्या कोणत्याही कृतीतून राष्ट्राचे नुकसान तर होत नाही ना, हा विचार प्रथम मनात आणा. पाठ्यपुस्तकाबाहेर डोकावून समाजात काय घडत आहे, याची नोंद घ्या. देशसेवा हा प्राधान्यक्रम ठेवा’, असा सल्ला सियाचिन आणि कूपवाडा येथे लष्करासाठी प्राणवायू युनिट उभारणाऱ्या ‘सिर्फ’ (सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन) संस्थेच्या सुमेधा चिथडे यांनी गुरुवारी विद्यार्थिनींना दिला.

‘सावित्री फोरम’च्या वतीने विद्या विकास सेवा प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष आणि नामवंत शैक्षणिक सल्लागार श्रीकांत सुतार यांच्या हस्ते सुमेधा चिथडे यांना सावित्री पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्या प्रसंगी चिथडे बोलत होत्या. ‘विद्यानिधी’ उपक्रमांतर्गत इयत्ता आठवी ते दहावीच्या गरजू ८० विद्यार्थिनींना दीड लाखांच्या शैक्षणिक मदतनिधीचे वाटप करण्यात आले. फोरमच्या अध्यक्षा मोनाली कोद्रे आणि उपाध्यक्षा सुप्रिया ताम्हाणे या वेळी उपस्थित होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिथडे म्हणाल्या, ‘पारंपरिक विद्याशाखांप्रमाणेच लष्करी क्षेत्रातही अनेक संधी आहेत. त्यामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवा. इतरांशी तुलना करू नका, स्पर्धा स्वतःशीच करा. मन, बुद्धी आणि शरीर यांच्यात एकवाक्यता असू द्या. आपले सैनिक सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेवर मात करत आपले संरक्षण करतात, याचे भान ठेवा. तक्रार, कारणे आणि अपेक्षांपासून दूर राहा, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.’