आर्थिक परिस्थितीच्या कठीण उंबरठ्यावर उभे राहूनही रेश्मा शिवाजी पुणेकर या जिद्दी मुलीने चौकटीच्या बाहेर जाऊन बेसबॉल या खेळात कारकीर्द करण्याचा निर्णय नुसताच घेतला नाही, तर भारतीय संघाची कर्णधार बनण्यापर्यंत तिने झेप घेतली. तिच्या या संघर्षशील, धैर्यशील आणि कृतिशील प्रवासाविषयी दीपक पडकर यांनी तिच्याशी केलेली बातचीत.

बेसबॉल या खेळाकडे कशी वळलीस?

लहानपणापासूनच खेळाची आवड होती. घरी खेळाचे वातावरण अजिबात नव्हते. खरे तर शालेय शिक्षणावरच सगळे लक्ष केंद्रित होते. मेंढ्यांना चरायला घेऊन जाताना काठी घेऊन धावणे, कधी त्याच काठीने दगड मारणे, कधी दगड हातात घेऊन फेकणे असा दिनक्रम होता. लोणी भापकर येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत असताना एक दिवस पुण्याहून हेमंत जगताप सर आमच्या शाळेत आले होते. त्या वेळी त्यांनी बेसबॉल या खेळाबाबत माहिती दिली. तेव्हाच पहिल्यांदा मला या खेळाविषयी समजले. या खेळाची अधिक माहिती घेऊन सरावाला सुरुवात केली आणि मेंढ्या चरण्यासाठी घेऊन जाणारी हातातील काठी स्लगर (बेसबॉलमधील बॅट) बनली. त्यानंतर झालेला सगळा प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत ठरला.

बेसबॉल खेळायला सुरुवात केल्यावर आजपर्यंतचा प्रवास कसा होता?

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत खेळायला सुरुवात केली. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळल्यावर आता भारतीय संघाची कर्णधार हे सगळं स्वप्नवत वाटतं. यामागे आई-वडिलांनी माझ्यासाठी केलेला त्याग आणि मी घेतलेल्या मेहनतीचा मोठा वाटा आहे. आतापर्यंत २८ राज्यस्तरीय सामने, ४ सुवर्ण, ६ रौप्य, ३ कांस्यपदकं मिळाली. महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरले. तब्बल २३ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व केले. भारतीय संघात निवड झाली. दोन वेळा आशियाई स्पर्धेत भाग घेतला. त्यानंतर २०२३ मध्ये तिसऱ्या महिला आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची कर्णधार बनले. आता पुन्हा एकदा थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून निवड झाली आहे.

खर्चाची बाजू कशी सांभाळलीस?

खेळात कारकीर्द घडविण्यासाठी निवडलेला बेसबॉल खेळ मुळात आपल्याकडे दुर्लक्षित. त्यामुळे प्रायोजक पुढे येणे शक्यच नव्हते. गावातील दानशूर व्यक्ती जी काही मदत करायचे त्यावरच आम्ही भागवत होतो. घरातील सगळे अशिक्षित. आपली मुलगी काही तरी वेगळं करते, हे त्यांना समजत होते. त्यामुळे ते माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले. माझी आवड जपण्यासाठी वडिलांना अर्धा एकर शेती आणि बकरीदेखील विकावी लागली होती. एकूणच भक्कम असे आर्थिक पाठबळ कधीच नव्हते. पण, आता शासकीय सेवेत रुजू झाल्याचा फायदा मिळतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढील प्रवास कसा होता?

एवढा सगळा संघर्ष करत असताना मी शिक्षणापासून कधीच दूर गेले नाही. बारामतीतून शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुण्यात चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयातून बीपीएड आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एमपीएडचे शिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्र शासनाकडून मला शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळाला. शासनाच्या धोरणानुसार आता पुणे महापालिकेमध्ये क्रीडा अधिकारी पदावर नियुक्ती मिळाली आहे. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी सुरू असून, बेसबॉल खेळात भारतीय संघाचे नाव उज्ज्वल करायचे आहे. भारतीय संघाला पदक मिळवून देण्याचे स्वप्न आहे.