स्थानिक संस्था कराच्या (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) विरोधात व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या बेमुदत बंदमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. हे आंदोलन शासनाच्या विरोधात असल्यामुळे व्यापाऱ्यांनी जनतेला वेठीस धरू नये. आंदोलनाचा इतर मार्ग स्वीकारावा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाने केले आहे.
आरपीआयचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे यांनी बेमुदत बंदबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. या बंदमुळे झोपडपट्टी भागातील तसेच वस्त्यांमधील छोटी किराणा दुकाने बंद ठेवली जात आहेत. त्यामुळे कष्टकरी, हमाल, रिक्षा चालक, छोटय़ा-मोठय़ा दुकानांमध्ये काम करणारे कामगार, रोजंदारीवर काम करणारे मजूर, धुण्याभांडय़ाची कामे करणाऱ्या महिला यांचे हाल होत आहेत, असे या पत्रकात म्हटले आहे.
एलबीटीच्या विरोधात सुरू करण्यात आलेले आंदोलन शासनाच्या विरोधात असल्यामुळे आंदोलनासाठी व्यापाऱ्यांनी अन्य मार्ग स्वीकारावा आणि बेमुदत बंद मागे घ्यावा, असेही आवाहन या पत्रकातून करण्यात आले आहे. व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची आरपीआयचे शिष्टमंडळ मंगळवारी भेट घेणार असून आंदोलन मागे घेण्याबाबत या वेळी चर्चा करणार असल्याचेही कांबळे यांनी कळवले आहे.