पुणे : चित्रकार हा स्वान्तसुखाय चित्रनिर्मिती करतो. मात्र, त्याच विश्वामध्ये रममाण होत असल्याने चित्रांचे जतन करण्यामध्ये चित्रकार मागे पडतो. प्रत्येक चित्रामागे काही कथा असतात. दस्तावेजीकरणाअभावी चित्राच्या कथा आणि चित्रामागच्या कथा विस्मरणात जातात, अशी खंत ज्येष्ठ चित्रकार सुहास बहुळकर यांनी रविवारी व्यक्त केली. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने भरविण्यात आलेल्या ‘व्यक्ति-चित्र-पट’ या गेल्या शंभर वर्षांतील मराठी चित्रकारांनी रेखाटलेल्या व्यक्तिचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन बहुळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे प्रमोद काळे यांचे चित्र रेखाटून त्यांनी या प्रदर्शनाचा श्रीगणेशा केला. सु-दर्शन कलादालन येथे २८ सप्टेंबरपर्यंत दररोज सायंकाळी चार ते आठ या वेळात हे प्रदर्शन खुले राहणार आहे.

बहुळकर म्हणाले, विद्यार्थी दशेत असताना श्रीधर पळशीकर यांनी चितारलेले चित्र या प्रदर्शनामध्ये आहे. वर्गातील श्रीमंत मुली शुक्रवारी पॅलेटवर भरपूर रंग ठेवून त्या निघून जायच्या. म्हणजे ते रंग वापरले जायचे नाहीत. शनिवार-रविवारी ते रंग सुकायचे. सोमवारी आल्यानंतर ते खरडायचे आणि कचऱ्याच्या डब्यात टाकायचे. हे लक्षात आल्यावर पळशीकर सर जेवणाच्या डब्यामध्ये ते रंग भरून घ्यायचे. कॅनव्हासचे तुकडे जमा करून त्या तुकड्यांवर त्यांनी चितारलेले चित्र या प्रदर्शनामध्ये आहे. त्यांनी एकदा मला जे. जे. कला महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कार्यालयात बोलावले होते. कपाटातून एक डायरी बाहेर काढून हळूच उघडली. त्या डायरीमध्ये ठेवलेले चित्र त्यांनी मला भेट दिले.

हेही वाचा : पुणे जिल्ह्यात १७६ जणांना नव्याने करोनाचा संसर्ग

तृतीय वर्षाचे शिक्षण घेत असताना १९७३ मध्ये भैयासाहेब ओंकार यांनी सांगितल्यानुसार त्यावेळी मी जयंतराव टिळक, इंदूताई टिळक, शि. द. फडणीस, निळूभाऊ दामले, वसंतराव वैद्य अशा अनेकांची व्यक्तिचित्रे काढली होती. दुर्दैवाने त्यातील एकही चित्र माझ्याजवळ नाही. पण, त्यावेळी मी चितारलेले शि. द. फडणीस यांचे चित्र त्यांनी माझ्याकडून मागून घेतले होते. आता मी ते त्यांच्या मुलीकडून आणले आहे. ग. ना. जाधव यांनी चितारलेले शांता शेळके यांचे चित्र आहे. त्यांनी वि. द घाटे, ज्ञान प्रबोधिनीचे अप्पा पेंडसे, ना. सी. फडके, व्यंकटेश माडगूळकर, शंतनूराव किर्लोस्कर अशा अनेकांची व्यक्तिचित्रे केली होती, अशा आठवणींना बहुळकर यांनी उजाळा दिला.

‘संपूर्ण जीवन स्वराधीन राहो, हा आशीर्वाद द्यावा’ – कलापिनी कोमकली यांची भावना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वा. गो. कुलकर्णी यांचे चित्र १९२५ मधील आहे. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन मी मुंबईच्या जहांगीर कलादालनामध्ये केले होते. लंडन येथून शिक्षण घेऊन भारतामध्ये आलेल्या त्यांच्या मुलाने हे चित्र मला भेट दिले. तांबड्या अलवणातील विधवा स्त्रीचे चित्र आपल्या घरात नको असे पुढच्या पिढीला वाटल्यामुळे ते चित्र माझ्याकडे आले असावे. – सुहास बहुळकर, ज्येष्ठ चित्रकार