पुणे : ‘फुले, शाहू, आंबेडकर यांच्या राज्यात सामाजिक विषमतेला थारा मिळता कामा नये, यासाठी डाॅ. बाबा आढाव यांनी आयुष्यभर संघर्ष केला. कष्टकऱ्यांशी प्रामाणिकता बाळगून त्यांची आयुष्यभर सेवा केली. एक गाव एक पाणवठा, देवदासी प्रथा निर्मूलन, पालखीतील जातिभेदाविरोधात आंदोलन आणि असंघटित कष्टकऱ्यांच्या चळवळींद्वारे त्यांनी समाजात समतेचा विचार रुजविला. डाॅ. आढाव राज्याच्या सामाजिक इतिहासाचा महत्त्वाचा भाग असून, त्यांच्यामुळे कष्टकऱ्यांच्या जीवनात स्थिरता आली,’ अशा शब्दांत ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी भावना व्यक्त केली.

डाॅ. बाबा आढाव यांच्या ९५ व्या वाढदिवसानिमित्त मार्केट यार्डातील हमाल पंचायती येथे आयोजित कार्यक्रमासाठी पवार रविवारी उपस्थित होते. त्यावेळी पवार यांनी बाबांच्या राजकीय, सामाजिक जीवनातील आठवणींना उजाळा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन पवार यावेळी उपस्थित होते. रिक्षा पंचायतीच्या ॲपचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. तसेच प्रतिमा परदेशी आणि किशोर ढमाले संपादित ‘सत्यशोधक संघटक डाॅ. बाबा आढाव’ या विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले.

पवार म्हणाले, ‘सत्याचा पुरस्कार करायचा. अन्याय होत असेल, तर लोकशाहीच्या चौकटीत राहून संघर्ष करायचे, हे बाबांच्या जीवनाचे सूत्र राहिले आहे. कष्टकऱ्यांच्या संघटना त्यांनी उभ्या केल्या. कष्टकऱ्यांच्या जीवनात स्थिरता आणण्यासाठी प्रयत्न केले. असंघटित कामगारांना आधार नसल्याने त्यांच्या मागे उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे, असे समजून त्यांनी या कार्याला वाहून घेतले. १९७२ मध्ये अकोला जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्यावरून उपेक्षित समाजाच्या नागरिकांवर हल्ले झाले होते. त्यानंतर समाजातील जनमत सुधारण्यासाठी बाबांनी अकोल्याला जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरच राज्यात एक गाव, एक पाणवठाची सुरुवात झाली. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरातही आढाव यांची भूमिका मोलाची होती.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कामगारांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार’

‘माथाडी कायद्याचा दुरुपयोग होत आहे. त्यावर कारवाई करण्याऐवजी सरकार कायदा बदलण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या या भूमिकेची कार्यकर्ता म्हणून चिंता वाटते. मात्र, माथाडी कायदा टिकावा यासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करणार आहे. वय कितीही झाले, तरी कामगारांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार आहे,’ असा निर्धार डाॅ. बाबा आढाव यांनी यावेळी व्यक्त केला.