शिरूर : ‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष ताकदीने लढवणार आहे. निवडणुकीबाबत महायुती करण्याचा निर्णय झाला तर चांगलेच; मात्र युती झाली नाही, तर जिल्ह्यात स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी पक्ष तयार आहे,’ असे ‘म्हाडा’चे अध्यक्ष, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी सांगितले.
शिरूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, शिवसेना (शिंदे) पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अनिल काशिद, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष शरद कालेवार, शिवसेना (शिंदे) पक्षाचे शहरप्रमुख मयूर थोरात, माजी सभापती विठ्ठल पवार, बाबूराव पाचंगे, प्रिया बिरादार आदी उपस्थित होते. ‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक पक्ष ताकदीने लढवणार आहे. जिल्ह्यात पक्ष चांगल्या स्थितीत आहे,’ असे आढळराव म्हणाले. ‘रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील एमईपीएल कंपनीचा प्रदूषणाचा विषय गंभीर असून, या कंपनीस नव्याने ६५ एकर जमीन देण्यास विरोध केला होता. राज्यातील १८ जिल्ह्यांतील घातक कचरा या कंपनीत येतो. मोठ्या लोकसंख्येच्या ठिकाणी हा प्रकल्प आणणे योग्य नाही,’ अशी भूमिका त्यांनी मांडली.
‘शिरूर नगर परिषदेच्या विकासकामांचा पुढील १५ दिवसांत आढावा घेणार आहे. जिल्हा नियोजन समितीमध्ये शिरूरसाठी आठ कोटींची कामे सुचवली आहेत. शिरूर शहरासाठी ८० कोटींची पाणीपुरवठा योजना आणण्यात आली आहे. मात्र, ठेकेदारांमध्ये समन्वय नसल्याने कामास विलंब होत आहे,’ असे आढळराव यांनी स्पष्ट केले.
‘स्वगृही जाण्याचा प्रश्नच नाही’
माजी खासदार आढळराव पाटील यांनी शिवसेना (शिंदे) पक्षातून ऐन लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. त्यांना शिरूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला. पुन्हा स्वगृही जाणार का, याबाबत विचारणा करण्यात आली असता, ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात सन्मान मिळत आहे. त्यामुळे स्वगृही जाण्याचा प्रश्न नाही.’