पुणे : गेल्या तीन ते चार दिवसांपासून खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे धरणांमध्ये पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रकल्पातील चारही धरणांमध्ये सद्य:स्थितीला ५.७४ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा झाला असून, सोमवारच्या तुलनेत मंगळवारी पाणीसाठ्यात ०.०७ टीएमसी अशी किंचित वाढ झाल्याची माहिती जलसपंदा विभागाकडून देण्यात आली.
खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांतून शहराला पाणीपुरवठा केला जातो. गेल्या तीन ते चार दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू आहे. मात्र, सोमवारपर्यंत पाणीसाठ्यात वाढ झालेली नव्हती. त्यानंतरच्या २४ तासांत धरणांतील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात २४ मिलीमीटर, पानशेमध्ये २५, वरसगाव धरणाच्या क्षेत्रात १७, तर टेमघर धरण परिसरात १५ मिलीमीटर पावसाची नोंद जलसंपदा विभागाकडून करण्यात आली.
चारही धरणांमध्ये मिळून ५.७४ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला असून, धरणे १९.७० टक्के भरली आहेत. गेल्या वर्षी याच दिवशी चारही धरणांमध्ये ५.७१ टीएमसी एवढा पाणीसाठा होता, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली. दरम्यान, खडकवासला धरणाच्या सांडव्यातून आत्तापर्यंत ३३.३५ टीएमसी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.