राष्ट्रीय कला अकादमी संस्थेतर्फे धामिर्क कार्यक्रमांमध्ये रांगोळ्या काढून देवाच्या आराधनेबरोबरच रांगोळ्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक संदेशही दिले जातात. संस्थेतर्फे विसर्जन मिरवणुकीत रांगोळीच्या पायघडय़ा घालत लहान मुलांचे शोषण व अत्याचारा विरोधात जनजागृती करण्याचे काम यंदाही करण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये साडेतीनशेहून अधिक रंगावली कलाकार सहभागी होणार असून गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचे रांगोळी प्रशिक्षण व सराव सुरू आहे. संस्थेचे संचालक योगेश गोलांडे व वर्गप्रमुख अमर लांडे यांनी ही माहिती ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. गोलांडे म्हणाले, ‘‘संस्थेतर्फे गेल्या १७ वषार्ंपासून विसर्जन मिरवणुकीत रांगोळी काढण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक विषय हाताळण्यात येतात. यंदा रांगोळी प्रशिक्षण शिबिरात बारा वर्षांच्या मुलींपासून ते सत्तर वर्षांपर्यंतचे नागरिक सहभागी झाले आहेत. शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक असा सर्वाचा समावेश आहे. हे कलाकार रांगोळीच्या सरावासाठी सकाळी सात ते साडे नऊ व सायंकाळी पाच ते सात या वेळेत एकत्र जमतात. चाळीस प्रशिक्षक प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहेत. यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत मंडई ते टिळक चौकापर्यंत रांगोळीच्या पायघडय़ा घालण्यात येणार असून अकरा चौकांमध्ये पस्तीस फुटी रांगोळी काढण्यात येणार आहे. टिळक चौकात नव्वद फुटी रांगोळी काढून या उपक्रमाची सांगता होणार आहे. उपक्रमासाठी आठशे किलो रांगोळी वापली जाईल. नागरी संरक्षण सेवेत कार्यरत असलेले प्रकाश जोशी म्हणाले, ‘‘मी गेल्या तीन वर्षांपासून प्रशिक्षण शिबिरात सहभागी होऊन गणेशोत्सव मिरवणुकीत रांगोळी काढत आहे. या उपक्रमाच्या माध्यामातून रांगोळी रेखाटन या कलेचा मनसोक्त आनंद घेतो आहे. गणेशभक्ती बरोबरच समाजातील अनिष्ट गोष्टींचा नाश करण्याचा संदेश रांगोळीच्या माध्यमातून दिला जातो. ही संकल्पना खूप आवडली.’’
संग्रहित लेख, दिनांक 9th Sep 2016 रोजी प्रकाशित
मिरवणुकीत रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश
संस्थेचे संचालक योगेश गोलांडे व वर्गप्रमुख अमर लांडे यांनी ही माहिती ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 09-09-2016 at 04:31 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Social message through rangoli in the immersion procession