“काही लोकांनी आम्हाला देखील वचन दिले आहे. परंतु आम्ही याबद्दल बोलत नाही, आम्ही ते करतो.” असं म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “भाजपामध्ये गेलेले अनेकजण परत येण्याच्या तयारीत आहे. शिवाय, पुणे, पिंपरी-चिंचवडमधील काही नेत्यांना परत यायची इच्छा असून, लवकरच त्यांचे स्वागत केले जाईल.” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना आगामी काळात भाजपाला धक्का बसण्याचे संकेत दिले होते. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“जर कोणी अजितदादांना त्यांच्या पक्षात सहभागी होण्याचे वचन दिलं असेल, तर त्यांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे. काही लोकांनी आम्हाला देखील वचन दिलं आहे. परंतु आम्ही याबद्दल बोलत नाही, आम्ही ते करतो. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या आणि शिवसेनेकडे गेलेल्या नेत्याचं आम्ही स्वागत केलं.” असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच, “अजित पवार जर इतरांच्या आमदारांबद्दल बोलत असतील तर त्यांच्यासोबतचे २८ आमदार का टिकले नाहीत? याचे त्यांनी उत्तर द्यावे. जर त्यांच्यासोबतचे २८ आमदारच टिकले नाहीत तर इतर पक्षांतील आमदार त्यांच्याकडे कसे येतील?” असा प्रश्न देखील चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाला धक्का बसणार?; काही नेते सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत!

तर, “भाजपामध्ये सहभागी झालेल्या नेत्यांना असे वाटले होते की, भाजपा सत्तेत येईल तेव्हा त्यांचे ऐकले जाईल. आता त्यांना भाजपला सोडचिठ्ठी द्यायची आहे, कारण त्यांची कामं झाली नाहीत. पुणे व पिंपरी चिंचवडमधील काही नेत्यांना परत यायची इच्छा आहे. त्यांचे लवकरच स्वागत करण्यात येईल.” असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.

माझी इच्छा आहे महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढवावी – फडणवीस

तर, या अगोदर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी, “आगामी काळात भाजपामध्ये अनेकांचा प्रवेश होणार आहे. मात्र, काहीजण उगाचच वावड्या उठवत आहेत की, भाजपाचे आमादार आमच्याकडे येणार. अशा वावड्या उठण्याचं एकमेव कारण म्हणजे कुणी त्यांच्याकडे जाणार नाही हे त्यांना देखील माहिती आहे. पण त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये एवढी प्रचंड अस्वस्थता आहे व आमदरांमध्ये एवढी जास्त नाराजी आहे. की हे आमदार काय करतील? अशा प्रकारची भीती मनात असल्यामुळेच त्यांना संकेत देण्यासाठी उगाचच पक्ष प्रवेशाच्या वावड्या उठवल्या जात आहेत.” असं नाशिकमध्ये बोलून दाखवलं होतं.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Some people have also promised us but we do not talk about it we do it chandrakant patil msr
First published on: 26-12-2020 at 19:35 IST