पुणे : आठवडाभरापासून पूर्वमोसमी पाऊस सुरू असल्याने घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक कमी झाली आहे. टोमॅटो, ढोबळी मिरची, फ्लाॅवर, आले या फळभाज्यांच्या दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी राज्य, तसेच परराज्यातून मिळून ८० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून ३ ते ४ टेम्पो कोबी, कर्नाटक आणि गुजरातमधून ३ ते ४ टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतून मिळून २ ते ३ टेम्पो शेवगा, हिमाचल प्रदेशातून ३ ते ४ ट्रक मटार, कर्नाटकातून १ टेम्पो भुईमूग शेंग, तसेच १ टेम्पो पावटा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटकातून ३ ते ४ टेम्पो तोतापुरी कैरी, गुजरात आणि मध्य प्रदेशातून १० ते १२ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
पुणे विभागातून सातारी आले ३०० ते ४०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार २ ते ३ टेम्पो, टोमॅटो चार ते साडेहजार हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची ७ ते ८ टेम्पो, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर ७ ते ८ टेम्पो, भुईमूग शेंग ४० ते ५० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ५० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ३० ते ३५ ट्रक बटाट्याची आवक झाली.
पालेभाज्यांच्या दरात वाढ
पावसामुळे पालेभाज्यांची आवक कमी झाली असून, सर्व प्रकारच्या पालेभाज्यांच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली. तरकारी विभागात कोथिंबिरीच्या ९० हजार जुडींची, मेथीच्या ४० हजार जुडींची आवक झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात पालेभाज्यांचे शेकड्याचे दर (रुपयांत) पुढीलप्रमाणे : कोथिंबीर – १५०० ते २५००, मेथी – १५०० ते २०००, शेपू – ८०० ते १२००, कांदापात- १२०० ते १८००, चाकवत – ६०० ते ८००, करडई- ८०० ते १०००, पुदिना – ६०० ते ८००, अंबाडी – ४०० ते ७००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा- ६०० ते ८००, चुका – ५०० ते १०००, चवळई- ३०० ते ७००, पालक- ८०० ते १५००
कलिंगड, खरबुजाच्या दरात घट
पावसामुळे सर्व प्रकारच्या फळांच्या दरात घट झाली आहे. पपई, चिकू, डाळिंबांच्या दरात वाढ झाली आहे. कलिंगड आणि खरबूजच्या दरात किलोमागे तीन ते पाच रुपयांनी घट झाली. हापूसचा हंगाम संपल्याने अन्य फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. डाळिंबांच्या दरात दहा टक्के, तसेच चिकूचे दर किलोमागे १०० रुपयांनी वाढले आहेत. अन्य फळांचे दर स्थिर असल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक फळबाजारात मोसंबी १५ ते २० टन, संत्री ५०० किलो, डाळिंब १९ ते २० टन, पपई १५ ते २० टेम्पो, लिंबे एक हजार ते १२०० गोणी, कलिंगड ४ ते ५ टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, चिकू ५०० खोकी, पेरू १५० ते २०० प्लास्टिक जाळी (क्रेट्स), तसेच केरळहून ६ ट्रक अननस अशी आवक झाली.