पुणे : केवळ महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण भारतामध्ये लव्ह जिहादवर बंदी घालावी, अशी मागणी तेलंगणाचे आमदार राजा भैय्या यांनी रविवारी केली. धर्मांतर बंद व्हायला हवे, लव्ह जिहादवर कायदा करा, या मागण्यांकडे त्यांनी लक्ष वेधले. पुण्यामध्ये रविवारी काढण्यात आलेल्या हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालेल्या राजा भैय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा – पुण्यात कोयता गँगची दहशत सुरूच, अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार

भारतातील अनेक तरुण-तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लव जिहादच्या नावाखाली फसवले जात आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलीचे ३५ तुकडे करून तिला मारण्यात आले होते. भारताच्या अनेक ठिकाणी बलात्कार होत आहेत, याकडे राजा भैय्या यांनी लक्ष वेधले. छत्रपती संभाजी महाराज यांनी देशासाठी आहुती दिली. त्यांनी ज्या दिवशी बलिदान दिले तो दिवस संपूर्ण भारतात बलिदान दिन म्हणून घोषित केला पाहिजे. आज याच मागणीसाठी पुण्यात मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच येत्या काळात गो- हत्या, लव जिहाद आणि धर्मांतर या विषयी कायदा झाला नाही, तर संपूर्ण भारतात असे मोर्चे निघतील, असा इशाराही राजा भैय्या यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच महाराष्ट्राच्या राज्य सरकारने याबाबत गंभीर विचार करायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा – पुणे : ‘धर्मवीर’ हीच छत्रपती संभाजी महाराजांची ओळख, शिवेंद्रराजे भोसलेंनी केलं अजित पवारांना लक्ष्य

धर्मवीर संभाजी महाराज यांच्याविषयी राजकारण करू नका. त्यासाठी दुसरे विषय आहेत. तसेच एखादा राजकीय नेता संभाजी महाराज यांच्यावरून राजकारण करत असेल तर त्याच्यावर बहिष्कार टाका, असे राजा भैय्या म्हणाले.