शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या धरणांपैकी टेमघर हे धरणही ५० टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहे. उर्वरित तीन धरणांपैकी खडकवासला हे धरण यापूर्वीच १०० टक्के भरले आहे, तर वरसगाव आणि पानशेत ही धरणे अनुक्रमे ६६ टक्के आणि ७१ टक्के भरली आहेत. सध्या चारही धरणांमध्ये मिळून एकूण पाणीसाठा ६९ टक्क्यांवर पोहोचला आहे.
खडकवासला धरणसाखली प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सध्या तुरळक पाऊस हजेरी लावत आहे. दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात सात मिलिमीटर, वरसगाव धरणक्षेत्रात एक मि.मी., तर पानशेत आणि खडकवासला धरणक्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली. सध्या चारही धरणांत मिळून २०.०३ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी २२ जुलै रोजी चारही धरणांत १४.२३ टीएमसी पाणीसाठा जमा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५.८० टीएमसीने पाणीसाठा जास्त आहे. धरणांमधील पाऊस कमी झाल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला विसर्ग थांबविण्यात आला असून नवीन मुठा कालव्यातून १००५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण परिसरात दिवसभरात १९ मि.मी. पाऊस पडला. या धरणात सध्या ६.२२ टीमसी म्हणजेच ७३.०७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यातील इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही तुरळक पाऊस हजेरी लावत आहे.
प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, कंसात टक्क्यांत
टेमघर २.०७ (५५.९७), वरसगाव ८.४२ (६५.६६), पानशेत ७.६० (७१.३७), खडकवासला १.९७ (१००), भामा आसखेड ६.७६ (८७.९९), पवना ६.२२ (७३.०७), गुंजवणी ३.०२ (८१.७६), भाटघर १५.६० (६६.३७), निरा देवघर ६.९२ (५९.०३), वीर ९.१० (९६.७८) आणि उजनी ३२.६० (६०.८४)