महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २०२१ घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल ३.७० टक्के लागला. परीक्षा दिलेल्या एकूण ४ लाख ६८ हजार ६७९ उमेदवारांपैकी १७ हजार ३२२ उमेदवार पात्र ठरले आहेत.

हेही वाचा- पुणे: लाल महाल ते पानिपत दुचाकी मोहीम; सशक्त भारत समूहातर्फे पानिपत गौरवगाथा जागर अभियान

राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य परीक्षा परिषदेने २१ नोव्हेंबर २०२१ रोजी टीईटी घेतली होती. त्यात पहिली ते पाचवीसाठीचा पेपर एक दिलेल्या २ लाख ५४ हजार ४२७ उमेदवारांपैकी ९ हजार ६७४ उमेदवार पात्र झाले. या गटाच्या पात्रतेची टक्केवारी ३.८० आहे. ६४ हजार ६४७ उमेदवारांनी सहावी ते आठवीसाठी गणित, विज्ञानाच्या पेपर दोन दिला होता. त्यातील केवळ १.४५ टक्के, म्हणजेच ९३७ उमेदवार पात्र झाले. तर सहावी ते आठवीच्या सामाजिक शास्त्रचा पेपर दोन १ लाख ४९ हजार ६०४ उमेदवारांनी दिला होता. त्यातील ६ हजार ७११ (४.४९ टक्के) उमेदवार उत्तीर्ण पात्र ठरले. पात्र ठरलेल्या उमेदवारांना संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांच्यामार्फत प्रमाणपत्र पाठवण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा- पुणे: ‘ॲकॅडमिक क्रेडिट बँक’साठी साडेचार लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; प्र-कुलगुरू संजीव सोनवणे यांची माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली टीईटी परीक्षा गेल्यावर्षी चर्चेत आली. राज्य परीक्षा परिषदेने २०१८ आणि २०१९मध्ये घेतलेल्या टीईटी परीक्षेतील गैरप्रकार गेल्या वर्षी उघडकीस आला होता. या प्रकरणी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. २०१८च्या परीक्षेत १ हजार ६६३ उमेदवारांनी, तर २०१९च्या परीक्षेत ७ हजार ८७४ उमेदवार असे साडेनऊ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षेत गैरप्रकार केल्याचे स्पष्ट झाले. परीक्षा परिषदेने संबंधित उमेदवारांची यादी प्रसिद्ध करून त्यांची संपादणूक रद्द करण्याची कारवाई केली आहे.