पुणे : शिवसैनिक हा आदेश पाळणारा आहे. तो एकनिष्ठ आहे. फाटका-तुटका आहे, मात्र त्याचा आत्मसन्मान जपा, शिवसैनिकाला विश्वासात घ्या, अशी अपेक्षा ठाकरे गटाच्या जिल्हा आणि तालुका प्रमुखांनी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे व्यक्त केली. महाविकास आघाडीचे सरकार असतानाही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अपेक्षित निधी मिळाला नाही. दौऱ्यात, मेळाव्यांच्या नियोजनात सहभागी करून घेतले जात नाही, अशी खंतही यावेळी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, आघाडीतील कोणत्याही पक्षाला दुखविले जाणार नाही. विश्वासात घेतले जाईल. सन्मान दुखावेल, असे काही होणार नाही. त्यासाठी आघाडीतील प्रमुख पक्षांच्या प्रत्येकी एक-एक प्रतिनिधींची मिळून समन्वय समिती स्थापन करण्यात येईल, असे आश्वासन सुळे यांनी दिले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून बारामती लोकसभा मतदारसंघातील जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शहर प्रमुख, आजी-माजी प्रमुख पदाधिकारी यांची बैठक झाली. खासदार सुप्रिया सुळे, ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सचिन आहिर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुखांनी त्यांच्या भावना खासदार सुळे यांच्यापुढे मांडल्या. हेही वाचा >>>अखेर ठरलं! पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलच्या उद्घाटनाला मुहूर्त बारामती लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. शिवसेनेचे या मतदारसंघात साडेतीन लाखांपेक्षा जास्त मतदान आहे. ही सर्व ताकद सुळे यांच्या पाठीशी असेल. सुळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणले जाईल. त्यामध्ये शिवसैनिकांची महत्त्वाची भूमिका असेल. शिवसैनिक आदेश पाळणार आहे. यापूर्वीच्या सर्व निवडणुकीत पक्षाच्या आदेशाचे पालन करण्यात येईल. मात्र, शिवसैनिकाचा स्वाभिमान दुखवला जाऊ नये. त्याच्या आत्मसन्मानाला ठेच लागता कामा नये. महाविकास आघाडी म्हणून त्यात-त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जावे, अशी अपेक्षा जिल्हा आणि तालुका प्रमुखांनी व्यक्त केली. शिवसैनिकांची भावना लक्षात घेतल्यानंतर सुळे यांनीही समन्वयासाठी प्रमुख पक्षांच्या प्रतिनिधींची मिळून समन्वय समिती स्थापन करण्याची घोषणा केली. निवडणुकीचे कार्यक्रम, नेत्यांचे दौर, त्यांच्या वेळा याची माहिती महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना दिली जाईल. कार्यकर्त्यांच्या मनात काही शंका असतील तर त्यांनी समन्वय समितीकडे त्या मांडाव्यात. त्यांचे शंका निरसन केले जाईल. माझ्या बाजूनेही कोणी दुखावेल, अशी कोणतीही कृती होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.