पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यात सरकारी लाल फितीचा अडसर निर्माण झाला आहे.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) आयटी पार्कमधील उड्डाणपुलासह पर्यायी रस्त्यांच्या सुमारे ६५० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे नियोजन केले आहे. या प्रकल्पांसाठी भूसंपादनाची जबाबदारी सहा महिन्यांत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आधी ‘एमआयडीसी’ आणि नंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) देण्यात आली. या गोंधळामुळे आयटी पार्कमधील प्रकल्प कागदावरच राहिले आहेत.

हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस बिकट होत आहे. आयटी पार्कमध्ये वाहनांची संख्या गेल्या काही वर्षांत प्रचंड प्रमाणात वाढली. त्यामुळे सध्याचे रस्ते अपुरे पडू लागले आहेत. त्यातच या रस्त्यांना पर्यायी रस्ते करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने वाहतूककोंडी ही नित्याचीच बाब आहे. त्यामुळे उड्डाणपुलासह नवीन पर्यायी रस्ते तयार करण्याचा प्रस्ताव आहे. हिंजवडीतील लक्ष्मी चौकात सातत्याने वाहतूककोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी या चौकात उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. हा पूल चारपदरी आणि ७२० मीटर लांबीचा असेल. त्यासाठी ४० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

हिंजवडीतील शिवाजी चौक ते स्मशानभूमी या रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. हा रस्ता ९०० मीटर लांबीचा आहे. हा रस्ता सहापदरी केला जाणार आहे. यासाठी २४.७४ कोटी रुपये खर्च येणार आहे. याचबरोबर आयटी पार्कमधील टप्पा एकपासून टप्पा तीनला जोडणारा नवीन रस्ता बांधला जाणार आहे. हा रस्ता ५ किलोमीटर लांबीचा असेल आणि त्यासाठी ५८४.१४ कोटी रुपये खर्च येईल.

आयटी पार्कमधील प्रकल्पांसाठीची जागा सार्वजनिक बांधकाम विभाग संपादित करून ‘एमआयडीसी’ला देणार होता. परंतु, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ‘एमआयडीसी’नेच हे भूसंपादन करावे, असा निर्णय झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाने आधी भूसंपादन करून नंतर ही जागा ‘एमआयडीसी’ला हस्तांतरित करण्यात वेळ घालवू नये. थेट ‘एमआयडीसी’नेच भूसंपादन करून रस्त्यांचे काम सुरू करावे, असे निर्देशही त्या वेळी देण्यात आले होते. यामुळे या प्रकल्पांचे भूसंपादन करण्यासाठी ‘एमआयडीसी’कडून प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या बैठकीत या प्रकल्पांसाठीचे भूसंपादन ‘पीएमआरडीए’कडे देण्यात आले. गेल्या सहा महिन्यांत केवळ भूसंपादन कोण करणार याचा निर्णय होऊ शकला नव्हता. यामुळे भूसंपादन होऊ शकले नाही आणि हे प्रकल्पही रखडले.

आयटी पार्कमधील प्रकल्प लक्ष्मी चौकातील उड्डाणपूल

लांबी : ७२० मीटर
खर्च : ४० कोटी रुपये
शिवाजी चौक ते स्मशानभूमी सहापदरी रस्ता
लांबी : ९०० मीटर

खर्च : २४.७४ कोटी रुपये

आयटी पार्क टप्पा एक ते टप्पा तीन नवीन रस्ता

लांबी : ५ किलोमीटर
खर्च : ५८४.१४ कोटी रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयटी पार्कमधील उड्डाणपुलासह पर्यायी रस्त्यांसाठी ‘पीएमआरडीए’कडून भूसंपादन केले जाणार आहे. या प्रकल्पांसाठीच्या जमिनीच्या सर्वेक्षणासह इतर आवश्यक बाबी ‘एमआयडीसी’ने पूर्ण केल्या आहेत. भूसंपादन झाल्यानंतर तातडीने या प्रकल्पांचे काम सुरू होईल.- अर्चना पठारे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी